Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Barsu Refinery Protest : बारसुत लाठीचार्ज झाल्याचे आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी फेटाळले; म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Barsu Agitation and CM Eknath Shinde : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती परीक्षणाला शुक्रवारी (ता. २८) स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. पोलिसांनी मात्र त्यांना माती परीक्षण सुरु असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. त्यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच महिलांना मारहाण केल्याचा आरोपही स्थानिकांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसू येथे कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच हा प्रकल्प स्थानिकांच्या सहमतीनेच पूर्ण करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

बारसू येथील परिस्थिताचा आढावा घेत असून तेथील वातावरण शांत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. शिंदे म्हणाले,"मी स्वतः उद्योगमंत्री (Uday Samant), जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी सतत संपर्क करून तेथील माहिती घेत आहे. बारसूत सध्या शांतता आहे. तेथे कुणी नाही. त्या ठिकाणी काही लोक आले होते. त्यांच्याशी १०-१५ मिनिटे चर्चा झाली. स्थानिकांवर लाठीचार्ज केला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली." त्यानंतर अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, "बारसू प्रकल्पाला (Barsu Project) विरोध करणारे भूमिपूत्र आहेत. ते गावकरी आहेत. त्यांच्या सहमती, इच्छेविरोधात आपल्याला प्रकल्प पूर्ण करायचा नाही. शेतकऱ्यांवर अन्याय, जोरजबरदस्ती करून कुठलेही काम होणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. सध्या या प्रकल्पाला ७० टक्के लोकांचा पाठिंबा आहे. मात्र काही स्थानिक आणि काही बाहेरची लोक विरोध करीत आहेत. उद्योगमंत्री, संबंधित अधिकारी या प्रकल्पाचे फायदे स्थानिकांना समजावून सांगतील. त्यासाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या जातील. मात्र स्थानिकांची सहमती असल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही."

यावेळी शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही टीका केली. शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी तेलशुद्धीकरण बारसू येथील जागा सूचविली होती. आता पद गेल्याने ते केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत. अडीच वर्षात केवळ अहंकारामुळे अनेक प्रकल्प ठप्प पडले होते. आमचे सरकार आल्यापासून रखडलेले, बंद पडलेले प्रकल्प मार्गी जात आहेत. एकीकडे प्रकल्प परराज्यात जातात म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे राज्यात होणाऱ्या प्रकल्पांना विरोध करायाचा, याला काही अर्थ नसतो."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT