Uday Samant
Uday Samant Sarkarnama
मुंबई

Uday Samant : सामंतांची डिग्री खरी की खोटी; वाद सुरूच...पण ज्ञानेश्वर विद्यापीठ तर देशातील स्किल युनिव्हर्सिटीचा पाया

सरकारनामा ब्यूरो

Uday Samant News : मागील काही दिवसांपासून उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची पदवी बनावट असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सामंत यांनी पदवी घेतलेले ज्ञानेश्वर विद्यापीठ हे देशातली पहिली स्किल युनिव्हर्सिटी होती.

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देण्यापेक्षा त्यांचा कौशल्य विकास (स्किल डेव्हलपमेंट) व्हावा. त्यादृष्टीने सरकार स्किल युनिव्हर्सिटीला चालना देत आहे. डॉ. मनोहर आपटे यांनी देशातील पहिल्या स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. १९८० मध्ये पुण्यातील नवी पेठेत स्थापन केलेले हे एक खाजगी विद्यापीठ होते. केंद्र सरकारच्या आठव्या पंचवार्षिक योजनेत ज्ञानेश्‍वर विद्यापीठाच्या कार्याचा गौरवाने उल्लेख करण्यात आला आहे. परंतू 2006 साली हे विद्यापीठ सरकारमान्य नसल्याने कोर्टाच्या नोटिसींमुळे बंद करावे लागले होते.  

‘पॉलिटेक्निक स्कूल ऑफ कॉमर्स’, लंडन येथून त्यांनी बी. एस्सी (अर्थशास्त्र) ही पदवी मिळवणारे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटस् अ‍ॅण्ड मॅनेजमेंट असोसिएशन’, लंडन आणि ‘कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्स अकौंटस् ऑफ इंडिया’ या संस्थांचे सभासद असलेले डॉ. मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापना केली होती. सुमारे दोन लाख विद्यार्थी विद्यापीठातून उत्तीर्ण झाले आहेत. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे ही या विद्यापीठाचेच विद्यार्थी आहेत.

    “उपलब्ध साधनांचा आणि उपकरणांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून स्वत: च्या पायावर विद्यार्थ्यांनी उभे राहिले पाहिजे. नोकऱ्या मागत फिरणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा नोकर्‍या देणार्‍या उद्योजकांची निर्मिती शिक्षणातून करता येईल का? अशा विचाराने हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते.

बुद्धिमत्ता, कौशल्य आणि हातोटी असताना केवळ परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून कुणाचाही तंत्र शिक्षणाचा अधिकार नाकारला जाऊ नये”, यासाठी मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्‍वर विद्यापीठाची स्थापना केली होती.  ज्ञानेश्‍वर विद्यापीठात प्रवेश घेताना गुणांची अट नव्हती, देणगी, दरडोई फी नाही, गुणवत्ता यादी नाही, प्रथम येणार्‍यास प्रथम प्रवेश, इच्छा असेल त्या अभियांत्रिकी शाखेला प्रवेश असे निकष त्यांनी ठेवले होते. केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित शिक्षण असावे अशी त्यांची संकल्पना होती. 2001 पर्यंत डॉ. विजय भटकर हे या विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू झालेल्या स्नेहलता देशमुख विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर होत्या.

पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणून ज्ञानेश्‍वर विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना सहा महिने पुस्तकी शिक्षण आणि सहा महिने प्रात्यक्षिके प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात द्यायची असे मनोहर आपटे यांनी ठरविले. त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करून कर्तृत्वसंपन्न अभियंत्यांच्या अनेक पिढ्या घडवून त्यांनी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. डॉ.आपटेंच्या या संकल्पनेचे भारतभर स्वागत झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT