Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : 'भाजपने जंगजंग पछाडले; पण ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवू शकलेले नाही'

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Mumbai News : आपल्याविरोधात भाजपने जंगजंग पछाडले. पण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकलेले नाही. हिंदुत्व हे हिंदुत्वच असते. ते व्यक्तीप्रमाणे बदलत नाही. जे आम्हाला बापजाद्यांनी शिकवले आहे, तेच सांगतो.. राष्ट्रवाद हेच आमचे हिंदुत्व आहे. मात्र, त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? देशात हिंदूना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतो. हेच त्यांचे हिंदुत्व आहे काय ? आम्ही भाजपला (BJP) सोडले, हिंदुत्व सोडले नाही, सोडूही शकत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला ठणकावले.

संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाचा मुंबईत संयुक्त मेळावा होता. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अवस्था झाली आहे. एक पक्ष फोडला, आता काँग्रेस (Congress) फोडणार आहेत, अशी चर्चा आहे. असे झाले तर मग देवेंद्र फडणवीस कोणते मंत्रीपद घेणार. आता भाजपमध्ये सर्व आयाराम आहेत!

आता महाराष्ट्रात 'इंडिया'ची बैठक होणार आहे. हे आमच्या देशाचे नाव आहे. देशाच्या विरोधात आणि जनतेच्या स्वातंत्र्याविरोधात असणाऱ्या विरोधी पक्षांची ही बैठक आहे. आम्ही विरोधी पक्ष नाही. देशविरोधी असणाऱ्या विरोधात आम्ही उभे ठाकलो आहोत, असेही ठाकरे म्हणाले. माझे आजोबा नास्तिक नव्हते. सर्व सण आमच्याकडे साजरे होतात. मात्र, ते अंधश्रद्धा, चुकीच्या पंरपरांच्या विरोधात होते. विचंवा सारखे बिऱ्हाड पाठीवर घेऊन ते फिरायचे. आम्ही विंचू आहोतच. आमच्या वाटेला याल, तर डंक मारणारच, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिली. ते अनेक गावात फिरत नंतर मुंबईत स्थायिक झाले!

प्रत्येक लढ्यात ठाकरे घराणे पुढे होते. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात ते पहिल्या पाच नेत्यांमध्ये सेनापतीसारखे होते. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे घराणे तेव्हा होते तरी का ? कोणत्या लढ्यात त्यांच्या राजकीय घराण्याचा पुढाकार होता, हे जनतेला त्यांनी सांगावे. छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य आमच्यासमोर आदर्श आहे. जे कोणी हिंदवी स्वराज्यावर चाल करुन आले, त्यांची थडगी महाराष्ट्राने बांधली आहे. मित्र म्हणून आम्ही हात पुढे केला. मात्र, ते खंजीर खुपसणार असतील, तर आम्हालाही लढाई करावी लागेल, असे जोरदार बाण ठाकरेंनी सोडले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT