Mubai, 24 March : विधान परिषदेतून आज (ता. 24 मार्च) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य निवृत्त झाले आहेत. या नऊ सदस्यांना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात ठाकरेंना चिमटे काढताना त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे कौतुक केले. पु. ल. देशपांडे यांच्यानंतर ‘कोट्या’धीश हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत. पण त्यांच्या कोट्या आम्हाला कमी ऐकायला मिळाल्या, ते पुन्हा आले तर कोट्या आम्हाला ऐकायला मिळतील, असे सांगताना 2019 मध्ये ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयावर फडणवीसांनी एक शायरी सादर करून भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि (स्व.) बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्वव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आपण आज निरोप समारंभ करत आहोत. राजकारणात अनेकवेळा मतभेद असतात, कधी सोबत असतो, तर कधी संघर्ष करतो. पण राजकारणापलीकडे एक नातं असतं. ते नातं सहप्रवासचं असतं. उद्वव ठाकरेंसोबतचा सहप्रवास अनेक वर्षांचा राहिलेला आहे. अनेक चांगल्या गोष्टी करण्याची आम्हाला एकत्रित करण्याची संधी मिळाली.
उद्धव ठाकरेंच्या स्वभावात राजकारण कमी आहे. त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. त्यामुळे अनेकवेळा निर्णय घेतात, त्यामुळे वेगळी परिस्थिती निर्माण होते. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच एकदा ठरवलं की निर्णय घ्यायचा असा उद्धव ठाकरेंचाही स्वभाव आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, ते निष्णात छायाचित्रकार आहेत. महाराष्ट्राच्या विविध छटा त्यांनी टिपल्या आहेत. गड किल्ले आणि वारीची परंपरा त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहे. त्यांनी संस्कृतीची जपणूक करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी खूष कष्ट घेतले आहेत. वारीचे छायचित्रण करताना त्यांनी मोठी रिस्क घेऊन हेलिकॉप्टरचे दरवाजे उघडे ठेवून केले होते.
राजकारणात आल्यानंतर ते पक्षप्रमुख आले. अनेक संकटे आली, संघर्ष होता. बराच काळ आम्ही एकत्र होतो. माझी त्यांच्याशी 2010 नंतर जवळीक आली. ती 2014 नंतर अधिक जवळीक आली. मैत्रीची भावना आमच्यात तयार झाली. आज आमच्यात मैत्री नाही, असे नाही. पण आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले, राजकारणात काम करत असताना एखादा निर्णय घेताना परिणामाची चिंता त्यांनी केली नाही. बाळासाहेबांनी सामान्यातील सामन्यांना राजकीय चेहरा देऊन त्यांचे नेतृत्व तयार करण्याचे काम जोपासले. तोच वारसा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जपला आहे.
पु. ल. देशपांडे यांना कोट्याधीश म्हणतात. पण पुलनंतर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ती मी उद्धव ठाकरे यांनाच देईन. त्यांच्या बोलण्यात मिश्किलपणा असतो. त्यांच्या भाषणाची पद्धत सहजपणे असते. अनेकदा ते भीडताना दिसता, पण त्यांचा तो स्वभाव नाही. संबंध ठेवण्याचा त्यांचा स्वभाव आहे. पण राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचा आवेश आणावा लागतो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे सहा वर्षे विधान परिषदेत होते. पण उद्धवजी तुमच्या कोट्या आम्हाला कमी ऐकायला मिळाल्या, तुम्ही जर निर्णय घेतला आणि पुन्हा तुम्ही विधान परिषदेत आला तर तुमच्या जास्त कोट्या आम्हाला ऐकायला मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.
आम्ही एकत्रित होतो, पण 2019 मध्ये जे काही झालं, आम्ही वेगवेगळं झालं. मला त्यावर एक शेअर ऐकावाची इच्छा आहे.
साजिश की सौगात पकड कर बैठ गए,
अनचाहे हालात पकड कर बैठ गए
जिनको मेरा हाथ पकड कर चलना था,
हैरत है वो बात पकड कर बैठ गए।
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.