Uddhav Thackeray - Shinde Government
Uddhav Thackeray - Shinde Government Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News: सत्तेची बेकायदा गढी उद्ध्वस्त करा; खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारा !

सरकारनामा ब्युरो

Gudhipadwa: आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. हिंदू धर्मीयांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस. यानिमित्ताने घरोघरी गु्ढ्या उभारल्या आहेत.

राजकीय नेत्यांनी आपल्या निवासस्थानी गुढ्या उभारुन जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. ठाकरे गटाने 'सामना'तून गुढीपाडव्याच्या निमित्ताने 'लोकशाहीची गुढी उभारण्याचा संकल्प आता जनतेलाच करावा लागेल,'अशा शुभेछ्या देत राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य करीत शिंदे गटाला टोला लगावला आहे.

"मांगल्य, चैतन्य, उत्साह आणि संकटांवर मात करून वाईट शक्तींविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. आज देशातील लोकशाही संकटात आहे, राज्यघटना संकटात आहे. घटनात्मक संस्थांचा मनमानी पद्धतीने गैरवापर सुरू आहे. ‘खोके’शाहीच्या माध्यमातून घटनाबाहय़ सरकारे स्थापन केली जात आहेत. असत्याच्या काठीवर उभारलेली सत्तेची ही बेकायदेशीर गढी उद्ध्वस्त करून सत्याची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारण्याचा संकल्प आता जनतेलाच करावा लागेल, असे आवाहन ठाकरे गटानं अग्रलेखात केलं आहे.

राज्यात गारपीठमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे ठाकरे गटाने लक्ष वेधलं आहे. "जीवसृष्टीमध्ये स्थित्यंतर घडवणारा आणि निसर्गातील मरगळ झटकून नवचैतन्य बहाल करणारा सण म्हणून गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा अशी झाली की, गुढीपाडव्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिसकावून घेतला," अशा शब्दात शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केला.

'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे की..

शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादनही मोठय़ा प्रमाणात वाढवले आहे. मात्र या वाढीव उत्पादनास खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजा भाव मिळत असल्याने यशाची आणि संपन्नतेची गुढी उभारणे शेतकऱ्यांसाठी कठीण होऊन बसले आहे.

पेन्शनच्या मागणीसाठी गेले काही दिवस सुरू असलेला संप आता सुदैवाने संपला आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे जे प्रचंड नुकसान झाले, त्याचे पंचनामे झटपट करणे आता सहज शक्य आहे. हे काम सत्वर झाले तर गुढीपाडव्यानंतर का होईना, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येऊ शकेल.

मांगल्य, चैतन्य, उत्साह आणि संकटांवर मात करून वाईट शक्तींविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. मात्र, आज देशातील लोकशाही संकटात आहे, राज्यघटना संकटात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT