Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shivsena News: ''शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी...''; ठाकरे गटाची घणाघाती टीका

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray On Shinde Group : ठाकरे गट व शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर सडकून टीका केली आहे. आता बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशीच ठाकरे गटाकडून शिंदेगटावर आगपाखड करण्यात आली आहे. शिवसेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चं मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे.

गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत, तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचं काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत अशी बोचरी टीका शिवेसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे) कडून सामना द्वारे करण्यात आली आहे.

याचवेळी शिवसेनाप्रमुख नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरड्यात लाथा घालत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले असल्याचंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.(Uddhav Thackeray)

मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले,आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच! अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर त्यांची राजकीय चिता पेटेल. हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली असेल असा हल्लाबोलही ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.

याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा निर्धार शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी प्रत्येकाने करायलाच पाहिजे. शिवसेनेच्या नावावर उतलेले-मातलेले मंबाजी, त्या मंबाजी मंडळाचे 'खोके' राजकारण, आणि त्यातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनाला उभारी देण्याचं काम शिवसेनेला करावंच लागणार आहे असंही 'सामना'त म्हटलं आहे.

'' हे ढोंग नाही तर काय?''

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे मागील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामाचं उद्घाटन आणि लोकार्पण केले. यावरुनही ठाकरे गटानं मोदींवर निशाणा साधला आहे. सामनात म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी हे चार दिवसांपूर्वी सर्व लवाजमा घेऊन मुंबईस आले. त्यांनी अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. त्यांनी मुंबईच्या विकासासाठी काही घोषणा केल्या. ज्या मोदी सरकारने दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवले, त्यांनी मुंबईत येऊन विकासावर भाष्य करावे हे ढोंग नाही तर काय? असा सवालही उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT