Cm Uddhav Thackeray latest marathi News
Cm Uddhav Thackeray latest marathi News Sarkarnama
मुंबई

`दादा भुसे, संजय राठोड यांनी मला शब्द दिला होता, अशा लोकांच काय करायचं?`

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ठाकरे आणि शिवसेना हे दोन्ही नावं न लावता, बाळासाहेबांचा फोटोही न वापरता तुम्ही जगून दाखवाच ,असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना दिले. (Uddhav Thackeray Latest news)

बंडखोरीचे हे कारस्थान भाजपचे आहे. थेट लढण्याची त्यांची हिंम्मत नाही म्हणून आपलीच लोकं फोडून ते मज्जा पाहतायत. पण त्यांची वापरा आणि फेकून द्या ही निती आहे, तुमचाही तसाच वापर करतील असा इशारा मी दिला होता, असे मी बंडखोरांना सांगितले होते. महत्त्वाकांक्षा असावी पण राक्षसी महत्त्वाकांक्षा असू नये. ज्याने दिले त्यालाच खावू नये' असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचं करायचं काय, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी करत वाईट वाटत असल्याचंही नमूद केलं.

जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांच्याशी संवाद साधताना त्यांनी बंडखोरांवर शरसंधान केले. ते म्हणाले, ``मी शिवसेना चालवायला नालायक असेन तर मी पायउतार होईन. बाळासाहेबांची शिवसेना म्हणता मग २०१२ मध्येच शिवसेना संपायला हवी होती. बाळासाहेबांनंतर तर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली. २०१४ नंतर मीच यांना उमेदवारी दिली आणि मंत्रीपद दिली. तेव्हाच माझे नेतृत्व मान्य नव्हते तर मी दिलेली उमेदवारी तरी का स्वीकारलीत?

एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, ``दोन्ही वेळेला 'यांना' मंत्रीपद दिले. जे नगरविकास खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात ते पण त्यांनाच दिले. मला या पैशाच्या भानगडी नको होत्या. हे पैसे कुणाचे? शिवसेनेच्या मंत्रीपदातून मिळालेले. पैसे तुम्ही माझ्या शिवसैनिकांना, पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांना द्या, असं मी त्यांना सांगितले होते. त्यांनी ते दिले. पण गांधीजींचा फोटो काढून तुम्ही त्यावर तुमचा स्टँम्प मारणार असाल तर ते चुकीचे आहे.``

ठाकरे म्हणाले, ``भाजपसोबत जावं असा माझ्यावर आमदारांचा दबाव आहे, असं ते मला म्हणाले होते. पण जे भाजप शिवसेनेच्या अनेकदा पदाधिकाऱ्यांवर आणि मातोश्रीवर घाणेरडे आरोप करतंय त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा मी पुन्हा जनतेत जाईन. या आरोपानंतर तुमचे रक्त कसे खवळंत नाही? हे सगळे मोठे झालेले षंढ गप्प बसतात आणि ती फायर आजी दोन दिवस उन्हात उभी राहते, असंही मी त्यांना सुनावले होते. तसेच मी पुन्हा भाजपच्या बाजूला जावून बसायचे आणि माझ्या बाजूला कोण तो तोतला बसणार? मी षंढ नाही. तुम्हाला जायचे तर जा. `वापरा आणि फेका`ही त्यांची नीती आहे. तुम्हालाही तसंच करतील. अशा शब्दात मी त्यांना स्पष्ट सांगितले होते.

भाजपमध्ये आपल्याशी लढण्याची हिंमत नाही. त्यामुळे आपलीच माणसं फोडायची आणि आपल्यावर सोडायची. हे मज्जा बघत बसणार. यांचे काहीच नुकसान होणार नसल्याची टिका त्यांनी भाजपवर केली.

`वर्षा` सोडलं जिद्द सोडली नाही!

मी `वर्षा` निवासस्थान सोडलं म्हणजे मोह सोडला आहे. जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिंमतीचं काम केलं असं सांगितलं होतं. त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे सांगितलं होतं, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.


पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण एक दिवस उठल्यानंतर शरिरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते, असेही ठाकरे यांनी सांगितले.

“कोरोनाचं संकट गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. करोनाचा त्रास संपत असतानाच मानेचा त्रास सुरु झाला आहे. कोणती व्यक्ती कोणत्या वेळी आपल्याशी कशी वागली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

झाड बहरेल
आमदार घेऊन जा. तुम्ही झाडाची फुलं, फळं काढू शकता पण तुम्ही झाडाची मूळं उपटून काढू शकत नाहीत. हे झाड बाळासाहेबांनी लावलेले आहे. त्याला बहर प्रत्येक मोसमात येणार आहे. पानं गळून जाईल. सुकलेली पान गळंत नाहीत तोपर्यंत झाड पुन्हा डवरत नाही हा निसर्गाचा नियम आहे. ही सडलेली, किड लागलेली पानं गळलीच पाहिजे. माझंअख्खं झाड किडण्यापेक्षा सडलेले गळून गेलेलं चांगलंच आहे. जे कधी माझे नव्हते ते मला सोडून गेले तर मला का वाईट वाटणार माझ्यासोबत कोणीच नाही. नवीन पालवी फुटणार आणि ती मी फोडणार. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापनेवेळी नारळ फोडला त्यावेळी जी परिस्थिती होती, ती समजून माझ्यासोबत राहणार असाल तर थंबा. नाहीतर तुम्ही पण जायला मोकळे आहात. निष्ठा काय असते हे दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

काही आमदार `कापलो तरी जाणार नाही`, असे म्हणाले होते. पण आता गेले आहेत तर जाऊ द्या. फूस लावून आमदारांना पळवून तिकडे कैदी करून ठेवले आहे. त्यांना आणण्याची जबाबदारी आहे. ते आल्यावर पाहू. पण मीच फूस लावून त्यांना पाठवत असल्याच्या वावड्या उठवल्या जातायत याविषयी चीड व्यक्त करत पक्ष फोडण्याचे पाप हे करत असल्याचा तळतळाट त्यांनी व्यक्त केला.
....
माणूस जेवढा मोठा होतो तेव्हा त्याची स्वप्नही मोठी होतात. शिवसेनेच्या जोरावर या सगळ्या मोठ्या झालेल्या माणसांची स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी माझ्यावर टाकलेली नाही. माझ्यावर शिवसैनिकांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.
.....
वीट आलाय.. ही विट आता डोक्यात हाणावशी वाटत असल्याचा उद्वेग यावेळी उध्दव ठाकरेंनी व्यक्त केला. उद्या ही लोकं आदित्यसोबतही असंच वागणर. यांचा मुलगा मात्र खासदार झालेला चालतो असे त्यांनी एकनाथ शिंदेंना खणखणीत सुनावले
......
मी नालायक असेल तर आता हे पद सोडायला तयार आहे. मी तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करत नाही. बाळासाहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली. जर ती चूक असती तर शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी चूक केली नसती शिवसेना ही माझ्यापेक्षा त्यांचे लाडके अपत्य. शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करा. निष्ठा कशी असते हे दाखवून द्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT