Uddhav Thackeray, Gautam Adani Sarkarama
मुंबई

Uddhav Thackeray On Adani : अदानींच्या कार्यालयावर ठाकरे गटाचा मोठा मोर्चा ; काय आहे कारण ?

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : 'सरकारने धारावीचा विकास करण्याचे कंत्राट अदानींच्या कंपनीला दिले आहे. धारावीतील टीडीआरचा सरकारने हिशोब द्यावा. धारावीसह मुंबईतील तीन मोठे प्रकल्पही अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे. परिणामी मुंबई अदानींची करण्याचा डाव हणून पाडण्यासाठी जाब विचारला पाहिजे. त्यासाठी १६ डिसेंबर रोजी धारावीतून सरकार आणि अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे,' असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) संपर्क कार्यालय 'शिवालया'च्या उदघाटनानंतर ठाकरेंनी धारावीच्या विकासाचा मुद्दा छेडला. यावेळी सरकारने अदानींना मुंबई आंदन देण्याचे ठरवले का, असा प्रश्न उपस्थित केला. ठाकरेंनी सांगितले, 'धारावीचा विकास झालाच पाहिजे. तेथील रहिवाशांचे त्यांच्या उद्योगांसह तेथेच पुनर्वसन झाले पाहिजे. स्टेशन प्रोजेक्ट म्हणून जाहीर केल्याने धारावीकरांना ३०० फुटांच्या जागा देण्यात येणार आहेत. मात्र इतर प्रकल्पाप्रमाणेच धारावीकरांनाही ४०० किंवा ५०० फूट जागा द्यावी,' अशी आग्रही मागणी ठाकरेंनी केली.

सरकार मूळच्या धारावीकरांनी बाहेर करण्याचा डाव आखत असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. याबाबत ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'धारावीतील ५८ हजार झोपड्या पात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. मात्र ८०-९० हजार झोपड्या पात्र-अपात्रेच्या सीमेवर आहेत. या झोपडीधारकांना आताचे विकासक अदानी धारावीबाहेर काढणार आहेत का ? सरकारने अदानींना खास सवलती दिलेल्या आहेत. येथील टीडीआरमध्ये अदानी कंपनीला ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून अदानींचे कसे भले होईल, यासाठीच सरकार प्रयत्न करत असल्याचे दिसून येते,' असा आरोप करून ठाकरेंनी धारावीतील टीडीआरचा हिशोब मागितला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आता हा विषय धारावीपुरता मर्यादीत राहिलेला नाही. मुंबईतील तीन मोठे प्रकल्पही अदानींच्या घशात घालण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई अदानींची झाली का ? ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे. ही मुंबई कुणी दान दिलेली नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी, अदानींकडून स्पष्टीकरण घेण्यासाठी धारावीमधून १६ डिसेंबरला मोठा मोर्चा अदानींच्या ऑफसवर जाणार आहे,' अशी माहिती ठाकरेंनी दिली.

यानंतर सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'सरकारनेही कुणासाठी मिंधे होऊ नये. लवकरच सत्तासंघर्षाचा निकाल येणार आहे. त्यामुळे जाता-जाता कुणाची तरी धुणीभांडी करताना मुंबा देवीची मुंबई (Mumbai) कुणाला तरी आंदन देऊ नये. तसे होताना दिसले तर शिवसेनेची रस्त्यावरची ताकद दाखवून देऊ,' असेही ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT