Jitendra Awhad 
मुंबई

Jitendra Awhad : आव्हाडांनी दिलेल्या छत्रपती शिवरायांच्या संदर्भामुळं गदारोळ; विधानसभेत सत्ताधारी आमदारांचा राडा; नेमकं काय घडलं?

Jitendra Awhad : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयका'वर सध्या विधानसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही जुने संदर्भ देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळचा एक संदर्भ सांगितला. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात मोठा गदरोळ माजला, सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते.

Amit Ujagare

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक संदर्भ दिला. पण हा संदर्भ देताना त्यांनी केलेल्या एका विधानामुळं विधानसभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला. सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांच्या या विधानावर आक्षेप घेत जोरदार राडा घातला. यावेळी आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरल्यानं हा गोंधळ वाढत गेला. शंभुराज देसाई, दादा भुसे, योगेश सागर या आमदारांनी माफीची मागणी लावून धरली. तर नितेश राणे यांनी आव्हाडांचं निलंबन करण्यात यावं, अशी आक्रमक भूमिका घेतली.

नेमका विषय काय?

विधानसभेत शनिवारी उशीरा 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६' मांडण्यात आलं. गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी हे विधेयक मांडलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी यावर सोमवारपासून चर्चा होईल असं सांगितलं. त्यानुसार, आज सकाळपासून या विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही जुने संदर्भ देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळचा एक संदर्भ सांगितला. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात मोठा गदरोळ माजला, सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरल्यानं हा गोंधळ वाढत गेला. शंभुराज देसाई, दादा भुसे, योगेश सागर या मंत्र्यांनी माफीची मागणी लावून धरली. तर नितेश राणे यांनी आव्हाडांचं निलंबन करण्यात यावं, अशी आक्रमक भूमिका घेतली.

जितेंद्र आव्हाडांच्या या विधानानंतर मंत्री देसाई म्हणाले, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख करताना ते कुठल्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत, तो उल्लेख आम्ही पहिल्यांदाच ऐकला आहे. त्यांचं विधान कामाकाजातून काढा टाका अशी मागणी त्यांनी आक्रमकपणे अध्यक्षांकडं केली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना तात्काळ माफी मागायला लावा, अशी मागमी लावून धरली. त्यामुळं हा गोंधळ वाढतच गेला. देसाईनंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आव्हाडांच्या या विधानावर आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आव्हाडांनी भारताचं महाराष्ट्र दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केला आहे. त्यांच्या राज्याभिषेकाचा तिलक कशा पद्धतीनं झाला याबाबतचं विधान हे महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांना कोणाचं लांगूनचालन करायचं असेल तर त्यांना ते लखलाभ होवो. प्रत्येक समाजाच अनेक चांगल्या-वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, पण त्यांच्या सोयीप्रमाणं ते बोलतात. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणीही परवाना दिलेला नाही. त्यामुळं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली.

दरम्यान, तरीही सत्ताधारी आमदारांकडून आव्हाडांच्या विधानाविरोधात गोंधळ सुरुच होता. त्यामुळं अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित केलं, त्यानंतर पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा सत्ताधारी आमदार देत राहिले. छत्रपतींचा अपमान नही सहेगा हिंदुस्तान अशा घोषणाही यावेळी दिल्या गेल्या.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, जर देशाच्या आराध्य दैवताविषयी जर का आपल्या तोंडून कुठल्याही कारणास्तव कोणाची भावना दुखावली गेली असेल तर त्याबाबत माफी मागण्यास कोणाचाही कमीपणा होत नाही. त्यामुळं जर आव्हाडांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली तर ते योग्य ठरेल. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आपल्या जागेवरुन उठले आणि म्हणाले की, मला काही हा विषय वाढवायचा नाही. मी जे काही बोललो असेल त्यामुळं जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. पण आव्हाडांच्या या विधानानंतरही सत्ताधारी आमदारांचं समाधान झालं नाही. त्यानंतरही नितेश राणे हे गोंधळ घालत राहीले. त्यानंतर आव्हाड यांनी आपण सभागृहाची दिलगिरी व्यक्त करतो असं विधान केलं, तसंच त्यांचं शिवरायांबाबतचं विधान रेकॉर्डवरुन काढत असल्याचं जाहीर केलं.

यानंतर नितेश राणे आक्रमक झाले, ते म्हणाले की तुम्ही माफी मागायला लावली तरी आव्हाडांकडून हातवारे करणं, आमच्यावर उपकार करत असल्याचं ते दाखवत आहेत. इतर कोणाला खूष करण्यासाठी हे कार्यक्रम करत आहेत का? असा सवाल करत त्यांनी अध्यक्षांना विनंती केली की, जितेंद्र आव्हाडांचं निलंबन करा. उद्या हे काहीही बोलत राहतील. ही माफी मागायची पद्धत आहे का?

नितेश राणेंनंतर चारकोपचे भाजपचे आमदार योगेश सागर यांनी देखील आपली भूमिका मांडली. आव्हाडांनी केवळ दिलगिरी व्यक्त करुन भागणार नाही, म्हणून माझी मागणी आहे की, दिलगिरी हा शब्द चुकून जर तोंडून काही विधान निघालं तर व्यक्त केली जाते. पण जाणून बुझून जर कोणी चिथवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचं निलंबन करा.

त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला की, या राष्ट्रातील महापुरुषांबद्दल जर आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम ५३ अंतर्गत मला तुम्हाला निलंबित करावं लागेल. त्यामुळं माझी परत एकदा विनंती आहे की, तुम्ही केलेल्या विधानबद्दल सभागृहाची माफी मागून ही चर्चा पुढे नेऊयात. त्यानंतर आव्हाडांनी सभागृहाची माफी मागितली आणि या विषयावर पडदा टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT