Vasai ro-ro service Sarkarnama
मुंबई

Vasai ro-ro service : भाईंदर ते वसई रो-रो सेवेला सापडला मुहूर्त

Pankaj Rodekar

Thane News : मीरा भाईंदर वासीयांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तसेच रस्त्यामार्गे 40 किलोमीटर अंतर कापण्यासाठी दीड तासांचा प्रवास आता जलवाहतुकीच्या मार्गे केवळ 15 मिनिटांमध्ये होणार आहे.हे अंतर अवघे साडेतीन किलोमीटर असल्याने हा प्रवास सुखकर होणार आहे.ही जलवाहतूक रो-रो भाईंदर ते वसई सेवा मंगळवारी सुरू होणार आहे.जिल्ह्यातील ही पहिलीच जलवाहतूक सेवा असून दर माफक असणार आहेत.अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या रो-रो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत.

ठाणे जिल्ह्याला लाभलेला 32 किलोमीटरचा खाडी किनारा लक्षात घेता जलवाहतुकीसाठी खासदार राजन विचारे विशेष प्रयत्नशील होते. आमदार असल्यापासून ते यासाठी प्रयत्न करीत होते.खासदार झाल्यानंतर केंद्र शासनाकडे जलवाहतुकीला चालना मिळावी, यासाठी तत्कालीन केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सहा महापालिकेला जोडणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पाचे ठाणे महापालिकेमार्फत प्रस्ताव तयार करून त्याचे सादरीकरण करण्यात आले होते.त्यासाठी मान्यता घेत पहिला टप्प्यात भाईंदर,काल्हेर,डोंबिवली, कोलशेत या ठिकाणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत जेटीचे कामे सुरू केली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रो -रो सेवा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आली होती.त्यावेळचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी दिलेल्या प्रस्तावास मान्यता दिली.2016 ला राज्य व केंद्र शासनाच्या सागरमाला योजने अंतर्गत 14 कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली. भाईंदर येथील जेटीच्या सर्व पर्यावरणाच्या मान्यता मिळाल्यानंतर या भाईंदर जेट्टीचे काम एका वर्षापूर्वीच पूर्ण केले.परंतू वसईकडील जेट्टीला पर्यावरणाच्या व पुरातत्त्व विभागाच्या परवानग्या न मिळाल्याने या कामास सुरुवात करण्यास विलंब लागत होता.खासदार विचारे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर केल्या होत्या. सर्वप्रथम भाईंदर पश्चिमेकडील जेट्टीचे काम पूर्ण करून घेतले व त्यानंतर रखडलेल्या वसई जेट्टीचेही काम पूर्ण करून घेतले.

या दोन्ही जेट्टीची कामे पूर्ण झाल्याने खासदार विचारे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांना पत्राद्वारे भाईंदर ते वसई या तयार झालेल्या जेट्टीवरून तात्काळ रो-रो सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती. मात्र व्हीआयपींना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने खासदार विचारे यांनी केंद्रीय मंत्री सदानंद सोनवाल यांना जेटीच्या लोकार्पणासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली होती. या पत्राची दखल घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोजिक तत्त्वावर रो-रो प्रवासी फेरीबोट मंगळवारी 20 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिसेस सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रो-रो फेरीबोट सेवा चालविण्याचा ठेका देण्यात आला आहे.

असे आहेत दर...

- मोटर सायकल चालकासह - 60 रुपये

- रिकामी तीन चाकी रिक्षा मिनीडोर ( चालकासह) -100 रुपये

-चार चाकी वाहन (कारचालकासह) -180 रुपये

- मासे, पक्षी, कोंबडी, फळे इत्यादी( प्रती टोपली),व कुत्रा,शेळी,मेंढी (प्रति नग) - 40 रुपये

- प्रवासी प्रौढ (12 वर्षावरील ) - 30 रुपये

- लहान मुले (3 ते 12 वर्षापर्यंत) -15 रुपये

Edited By : Chaitanya Machale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT