Varsha Gaikwad Criticizes CM Shinde  Sarkarnama
मुंबई

Waterlogging at Mumbai : मुंबईची झाली तुंबई ; मुख्यमंत्र्यांवर गायकवाड बरसल्या ; याला जबाबदार कोण ? उत्तर द्या..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Rain News : पहिल्याच पावसात (Heavy Rains) मुंबईची दाणादाण झाली आहे. तासभर पडलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने काही गाड्या वाहून गेल्या आहेत. सायन, अंधेरी आणि विले पार्ले परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. याचा परिणाम वेस्टर्न एक्सप्रेसवर झाला आहे. अंधेरीपासून ते दहिसर, गोडबंदर रोडपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रमुख नाल्यांची सफाईची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी यावर्षी मुंबईकरांना नालासपाई झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच कुठलेही मुंबईकरांना त्रास देखील होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण त्याचे हे आश्वासन फोल ठरलं आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एक महिला रस्ता ओलांडण्यासाठी धडपडत असल्याचा व्हिडिओ गायकवाड यांनी ट्विट केला आहे. गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यात एक महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी तिला इतर पुरुष मदत करत आहेत. पावसामुळे अनेक गाड्या व्हिडिओमध्ये अडकल्याचेही दिसत आहे.गायकवाड यांनी मुंबईच्या या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे.

‘मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितले होते की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले गेले नाही. पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. धादांत खोटे बोलणारे हे सरकार आणि यांचे अधिकारी!’असे गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

गायकवाड आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ‘अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचलं आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? उत्तर द्या.’

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT