Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Statement: दिल्लीला पाणी पाजण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे; नाही तर....: उद्धव ठाकरेंचे सूचक व्यक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की प्रतिकूल काळातसुद्धा, त्यावेळी आग्रा होता. आता दिल्ली आहे. तेथील लोकांना कसं पाणी पाजू शकतो. आता तेथून आपण ती प्रेरणा घेतली नाही तर आपला काय उपयोग,’’ अशा शब्दांत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय लढाईसंदर्भात भाष्य केले. (We should take inspiration from Shivaji Maharaj to water Delhi : Uddhav Thackeray)

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या सहा ऐतिहासिक ग्रंथाचे प्रकाशन आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, मला महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचे कायम अप्रूप वाटतं. राजगडाची तटबंदी बघितली. ती तटंबदी कशी बांधली असेल. एवढे मोठंमोठे दगड वर कसे नेले असतील, असा विचार कायम डोक्यात येतो. या गडकिल्ल्याचे बांधकाम करताना जरा कुठे पाय सरकारला तर सरळ दरीत अशी अवस्था आहे.

त्या गडकिल्ल्यांकडे बघून मला वाटतं की, हे दुर्ग बोलायला लागले तर काय होईल. मला नेहमी असं वाटतंय की या गडकिल्ल्यांना काहीतरी सांगायचं आहे. दुर्गवैभव नाव फार छान आहे. पण, ते वैभव टिकविण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, मोडी लिपी ही आता मोडीत निघालेली लिपी आहे. कारण मोडी लिपी आता कोणी बघतच नाही. पण, माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे सुंदर मोडी लिपी लिहायचे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, या मंडळाची सर्व पुस्तके ही भविष्यात सर्वांना अभ्यासासाठी उपयोगात येतील, अशी आहेत. अरुणभाई मला असं वाटतंय की आता तुम्ही खानदेशातील रत्न असं एक पुस्तक प्रकाशित करावं. त्यात तुमचंही नाव येईल. संशोधनातील माणसं ही समाजात कमी आणि अभ्यासात जास्त असतात. मंडळातील सर्व लोकांनी अत्यंत चांगलं काम केलेले आहे, हे सर्व लोक पुस्तकाच्या माध्यमातून अजरामर हेातील.

संजय मुंदडा यांनी कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना बोलविण्याबाबतचा विषय माझ्याकडे मांडला. त्यावेळी त्यांनी मला ‘महाराष्ट्रातील दुर्गवैभव-शिवकालीन दुर्ग’ हे पुस्तक दिलं. त्याचवेळी मुंदडा यांना मी सांगितलं की उद्धव ठाकरे शंभर टक्के येणार. उद्धव ठाकरे यांना आणण्यामध्ये कोणतीच अडचण नाही. ते म्हणाले की कसं काय. कारण त्यांच्या आवडीचा विषय हा महाराष्ट्रातील दुर्गवैभव हा आहे, असे सांगून ठाकरेंच्या येण्याबाबतची ग्वाही दिली, असे थोरात म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT