Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : " आम्ही निवडणूक आयोगाला पक्षात फूट पडली नसल्याचं सांगितलं होतं. पण..." ; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

Deepak Kulkarni

Pune : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार जुलै महिन्यात थेट सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह शरद पवारांचे निष्ठावान समजले जाणारे प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ देत बंडाचं निशाण फडकवलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. याचवेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,अध्यक्षपद आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकला आहे.

याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहचला आहे. राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट निर्माण झाले असून आता दोन्ही गटात पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. येत्या ६ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला पक्षात फूट पडली नसल्याचं सांगितलं होतं. पण, आयोगानं आमची बाजू न ऐकता फूट असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहे. निवडणूक आयोग अयोग्य वागत आहे, असा त्याचा अर्थ दिसत असल्याची टीका पाटील यांनी केली.

'' ...अन्यथा सरकारच कंत्राटी पद्धतीनं चालवायला लागेल! ''

जयंत पाटील म्हणाले, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरूनही जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. तिथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणं चुकीचं आहे. जबाबदारीची पदेही कंत्राटी पद्धतीनं भरली तर अतिशय गंभीर प्रश्न आहे. पैसे वाचवण्यासाठी बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन काही कामे करून घेतली आणि त्यात चूका आढळल्या, तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो. कंत्राटी कर्मचारी नियुक्तील मर्यादा असल्या पाहिजे. अन्यथा सरकारच कंत्राटी पद्धतीनं चालवायला लागेल असंही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुन्हा पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी एकत्रित येतील अशी चर्चा होती. मात्र या बैठकीला अजित पवार यांनी दांडी मारत शरद पवार(Sharad Pawar) यांच्यापुढे येणे टाळले आहे. यावर जयंत पाटील यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या बैठकीला उपस्थित नव्हते. याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं, “अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. कदाचित त्यांना दुसरी कामं असतील. त्यामुळे येणं शक्य झालं नसेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT