Ajit Pawar-Bharat Gogawale-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shinde Group Upset : आता नाराज होऊन काय फायदा? अर्धी अर्धी भाकरी खावी लागणार; अजित पवारांच्या एन्ट्रीनंतर शिंदे गटाची हतबलता

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देशहितासाठी आणि राज्य हितासाठी जो काही निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना सहकार्य करणे, आम्हाला क्रमप्राप्त आहे, ते आम्ही करतोय.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politic's : नाराज होऊन आता काय करणार. जी वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारली पाहिजे आणि तिला सामोरे गेले पाहिजे, त्यामुळे आता नाराज होऊन काय चालणार नाही. थोडीफार नाराजी प्रत्येकांची राहणारच आहे. कारण, ज्याला एक भाकरी खायची होती, आता अर्धी मिळाली आहे आणि ज्याला अर्धी खायची होती, त्याला पाव मिळणार आहे. राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर ते सर्व स्वीकारून पुढे चालायला पाहिजे, अशा शब्दांत अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागाबाबत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी हतबलता व्यक्त केली. (What's the point of being upset now?: MLA Bharat Gogawle)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना-भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सत्तेतील सहभागावर बोलताना आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आपली हतबलता व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही सध्या तरी मिळणाऱ्या भाव भाकरीत खूश आहोत, त्यामुळे काळजी करायचे काही कारण नाही.

अजित पवार यांच्या अर्थखात्याबाबत आमदार भरत गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देशहितासाठी आणि राज्य हितासाठी जो काही निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना सहकार्य करणे, आम्हाला क्रमप्राप्त आहे, ते आम्ही करतोय. त्यामुळे अजित पवार यांना कुठलं खातं द्यायचं आणि काय द्यायचं, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील.

शिवसेना ठाकरे गटाने आमदार अपात्रतेसंदर्भात जी काही याचिका दाखल केली आहे. त्याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरवतील. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या आठ दिवसांत होणार आहे. त्यात आतातरी भगत गोगावले दिसायला पाहिजेत. कारण, मंत्रिपदाच्या यादीत मी जो पहिल्या नंबरला होतो, ते आता इथपर्यंत आलो आहे. पण, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मला संधी मिळेल, त्यामुळे काळजी करायचे काय कारण नाही, असेही गोगावले यांनी नमूद केले.

गोगावले म्हणाले की, मंत्रिपदाच्या पहिल्या नऊ जणांच्या यादीत मी पहिल्या क्रमांकाला होतो. काही कारणास्तव मला थांबवे लागले होते. ते आतापर्यंत थांबलो आहे. आता थांबण्याचे काय कारण नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठरवलं आहे की, आता जो विस्तार होईल, त्यात माझा नंबर नक्की लागेल.

राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. स्वप्नात कधी विचार केला नसेल की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील. पण अजित पवार आमच्यासोबत आल्याने ते शक्य झाले. आम्हाला अजित पवार येण्याबाबत माहिती नव्हते. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ते माहिती होते, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT