MLA Suhas Kande|
MLA Suhas Kande| 
मुंबई

उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही उद्धव साहेबांना नेहमीच ब्लॅकमेल केलं; सुहास कांदे आक्रमक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आजचा दिवस चांगलाच वादळी ठरला. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी चांगलेच आक्रमक झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अनेक त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, पण तरीही कांदे आक्रमक होते. यावेळी बोलताना सुहास कांदे यांनी थेट, तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केलंच तुम्ही... असे विधान केले. कांदेंचे हे विधान सध्या चर्चेत आले आहे.

सुहास कांदे आणि भुजबळ वाद राज्यात सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असल्यापासून हा वाद सुरु आहे. त्यावेळी वाद तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंतही (Udhhav Thackeray)पोहचला होता. पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी हा वाद काही अंशी मिटवलाही. पण आज पावसाळी अधिवेशनात हा वाद पुन्हा उफाळून आला. आज अधिवेशानादरम्यान बोलताना सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आक्रमक झाले.आमदार कांदे यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली, पण तरीही कांदे आक्रमक होते.

काही महिन्यांपूर्वीच भुजबळांविरोधात सुहास कांदे यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेही तक्रार केली होती. पण तेव्हा ती फाईल बंद करू भुजबळांना क्लिन चिट देण्यात आली होती. त्यावरही आज आमदार कांदेंनी ताशेरे ओढले. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानंतर समाधान न झाल्याने ‘अहो फडणवीस साहेब, असं काय करताय..? तुमच्याकडे बघून तर आम्ही इकडे आलोय...’, असे आमदार कांदे म्हणाले.

यावेळी सुहास कांदे यांनी सुरवातीलाच 2015 च्या सुमारास झालेल्या महाराष्ट्र सदन घोटाळयाचा (Maharashtra Sadan Scam) लेखाजोखा मांडला. अंजली दमानिया (Anjali Damaniya) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी अंधेरी आरटिओ आणि महाराष्ट्र सदन संदर्भात तक्रार दाखल केली होती. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते.

याबाबत बोलताना सुहास कांदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस तुम्ही जे उत्तर दिलं आहे, त्यावर मी समाधानी नाही. १८६० कोटी रुपयांचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे. तत्कालीन मंत्र्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२१ ला पुन्हा जीआर काढण्यात आला होता. २१.३.२२ रोजी उच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे, असे पत्रही काढण्यात आले होते. मग नंतर असे काय प्रेम उफाळून आलं की या घोटाळ्यात सरकार अपिलात गेले नाही.

या प्रकरणात सातभाई नामक न्यायाधीशांची बदली करण्यात आली. ज्याअर्थी त्या निकालामुळे न्यायाधीशांची बदली झाली त्या अर्थी तो निकाल संदिग्ध आहे. यासाठी तुम्हाला पुन्हा ओपीनियन मागवायची गरज नाहीये. म्हणजेच तुम्ही भ्रष्टाचार करुन ओपीनियन मागवलं. आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल तर केलंच तुम्ही, असंही विधानही सुहास कांदे यांनी केलं. जर दोन जीआर निघाले, पण पुन्हा अपिलात जाऊन ओपीनियन मागवायची गरजच नाहीये. जर आपण पुर्वीच्या सरकारचे निर्णय बदलले तर हा निर्णय बदलायला काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT