Bachchu Kadu  Sarkarnama
नगर

Bachchu Kadu : भूसंपादन मंजुरीसाठी बच्चू कडूंनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नियम दाखवत धरले धारेवर !

राजेंद्र त्रिमुखे

Bachchu Kadu: माजी जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी नगर जिल्ह्यात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ऊस दर प्रश्नी जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर दबाव वाढवण्यासाठी नगरमध्ये येऊन आंदोलनात उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आता बुडीत क्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करून भूसंपादन मंजुरीसाठीच्या प्रकरणात जिल्हाधिकारी कारणे देत निर्णय घेत नसल्याने बच्चूभाऊ संतापले असून त्यांनी आपल्या थेट रोखठोक भाषेत जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीबाबत विचारणा केल्याचे बोलले जातेय.

माजी जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या कार्यकाळात जायकवाडी धरणात नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथील बुडीत क्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करून भूसंपादन मंजुरीसाठी प्रकरण अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले होते. या प्रशासकीय मान्यतेला जिल्हाधिकाऱ्यांनी अति विलंब केल्याने बच्चू कडू यांनी खडे बोल सुनावत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांच्याकडे मंत्रालयात जायकवाडी धरण बुडीत क्षेत्रात असणाऱ्या शेतजमिनीबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दोन वेळेस सुनावणी लावून जलसंपदा व गोदावरी महामंडळाकडून हे क्षेत्र बुडीत असल्याचा प्रस्ताव भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठवला होता. या भूसंपादन प्रक्रियाबाबत असणाऱ्या सगळ्या विभागांची ना हरकत आल्यानंतर अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता देण्यास टाळाटाळ केल्याची धारणा 'प्रहार'ने व्यक्त केली आहे.

या प्रकरणाबाबत जिल्हाप्रमुख पोटे व प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस धरणग्रस्त शेतकऱ्यांसह बच्चू कडू यांची भेट घेऊन प्रकरण सांगितल्यानंतर कडू यांनी कागदपत्रे प्रस्ताव तपासून अहमदनगर जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव आता मंजूर करता येणार नसून सर्व प्रस्ताव एकत्रित करून करणार असल्याचे सांगतल्याचे बोलले जाते.

दूरध्वनीद्वारे दिला आंदोलनाचा इशारा

जायकवाडी धरण होऊन पन्नास वर्षे झाली. आणखी शेतकऱ्यांना तुम्ही किती मारणार आहात. कलेक्टरचा पगार एक महिना थांबला तरी आपण आंदोलन करणार, मग कुठलेही अडचण नसताना नियमात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी द्या. पुढील एकत्रित प्रस्ताव पुढील टप्प्यात मंजूर करा. या प्रकरणाचे दोन टप्पे करा, आलेला प्रस्ताव करणार आहात की नाही फक्त हो किंवा नाही सांगा मग आम्ही बघतो पुढे काय करायचं ते, अहमदनगर येथे येऊन आंदोलन करेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दूरध्वनीद्वारे दिल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT