Sanjay Raut & Dada Bhuse Sarkarnama
नाशिक

Dada Bhuse : दादा भुसेंनी काढले संजय राऊतांचे 'कर्तृत्व'

सरकारनामा ब्युरो

Political News : आजचा निकाल म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. श्रीरामांचा आशीर्वाद यामागे असून, नारदमुनीमुळे हा सर्व प्रपंच झाल्याची टीका पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. संजय राऊत यांचा लोकांना कंटाळा आला आहे. मीडियासमोर चमकोगिरी करायची. त्यांनी कोणाचे रेशन कार्ड काढून दिले की दवाखान्यात मदत केली. त्यांचे कर्तृत्वच काय असा प्रश्न उपस्थित करीत पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना एकनाथ शिंदे (Eaknath shinde) यांचीच असल्याचा निर्वाळ दिला, त्यावेळी भुसे नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हजर होते. निकाल समोर येताच त्यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला. विजयाबाबत प्रतिक्रिया देताना भुसे यांनी सांगितले की, नार्वेकर हे स्वत: वकील आहेत. कायद्याचे विवेचन करून आणि सखोल अभ्यासाअंती त्यांनी निकाल दिल्याचे भुसे म्हणाले.

या निकालावर आदित्य ठाकरे व संजय राऊत यांनी टीका केल्याबाबत भुसे यांना पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरेंच्या बुद्धीबाबत कीव येत असल्याचे सांगितले. माझ्या मनाविरूद्ध गेले तर चुकीचे आणि मना प्रमाणे झाले तर बरोबर असे कसे होऊ शकते, असा प्रश्न भुसे यांनी उपस्थित केला. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

भुसेंच्या निशाण्यावर राऊत

दादा भुसे (Dada Bhuse ) यांनी राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. लोकांना त्यांचा विट आला आहे. मात्र, हे मिडीयासमोर चमकोगीरी करतात. वास्तविक नारदमुनीमुळेच (संजय राऊत) हे दिवस आल्याचे भुसे म्हणाले. संजय राऊत यांचे कर्तृत्व काय? त्यांनी कुणाचे रेशन कार्ड काढून दिले की, दवाखान्यात मदतीला धावले. आयत्या बिळावरचे नागोबा असून, आत्ताच्या सामना आणि त्यावेळी मार्मिकमध्ये क्लार्क म्हणून संधी होती. मी पातळी सोडून बोलत नाही. मात्र, ते शिवसेना बळकावयला पाहत असल्याचा आरोप भुसे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांचा अधिकार, कोर्टात जाऊ शकतात

राऊत यांना सतत मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडतात. दोन तीन वेळा संधी मिळाली. मात्र ते स्वत: कोणत्या आमदारांच्या जीवावर खासदार झालेत. कायदा आणि नियमांच्या आधारे विधानसभा अध्यक्षांनी चांगले विश्लेषण केले. त्यामुळे लोकशाहीतील अधिकारानुसार त्यांना कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे भुसे म्हणाले.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT