Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
पिंपरी चिंचवड

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचे अध्यात्मिक भाषण; सांगितला प्रगतीचा मार्ग

सरकारनामा ब्युरो

Eknath Shinde in Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी येथे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित राष्ट्रीय महासत्संग सोहळा आज पार पडला. यास गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे (Annasaheb More) यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राज्यभरातून सुमारे तीन लाखांहून अधिक सेवेकरी मंडळींनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कोल्हापूरहून खास हेलिकॉप्टरने आले होते. त्यावेळी त्यांनी १६ मिनिटांचे भाषण केले. ते पूर्णपणे अराजकीय आणि अध्यात्मिक होते. त्यातून त्यांनी राष्ट्राची प्रगती कशी साधता, येईल याचा मार्ग सांगितला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "राजसत्ता व धर्मसत्ता एकत्र आल्यास राष्ट्राची प्रगती जलद गतीने होते. शासन पोहचू शकत नाही, तेथे गुरुमाऊलींच्या माध्यमातून शासनाच्या योजना पोचतात. त्यामुळे असे सत्संग काळाची आणि समाजाचीही गरज आहे", असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पुढे बोलतना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गुरुमाऊलींच्या परिवारातील सदस्य म्हणून आलो आहे. लोकसेवा हेच खरे अध्यात्म आहे, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो यासाठी काम करायला हवे, ही शिकवण अशा सोहळ्यातून मिळते. शासनाच्या जनहिताच्या योजना अशा सोहळ्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात आणि जनतेला त्याचा लाभ मिळतो."

यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे (Mahesh Landge), संजय शिरसाठ, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा अजित पवार, देहू, आळंदी, जेजूरी आणि पिंपरी-चिंचवड देवस्थानचे विश्वस्त अनुक्रमे नितीनमहाराज मोरे, ॲड. विशाल ढगे-पाटील, तुषार साने आणि तांबे महाराज तसेच दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे ॲड. शिवराज कदम आदी उपस्थित होते.

माऊली अण्णासाहेब मोरे (Annasaheb More) म्हणाले, संतांनी, महापुरुषांनी दुसऱ्यासाठी जगण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. ती नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. निसर्गाचे संरक्षण करुन त्यांचे संवर्धन करावे. घरातघरात आदर्श नागरिक तयार झाले पाहिजे. निर्व्यसनी पिढी तयार झाली पाहिजे."

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "माणसाची सेवा हाच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग असल्याची शिकवण गुरुमाऊली देत आहेत. सत्संगाच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे कार्यही ते करीत आहेत."

सामूहिक प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे सव्वा कोटी संख्येत विश्वविक्रमी पठण यावेळी करण्यात आले. या सोहळ्यातील बेरोजगार मेळाव्यात ११ हजार नोकऱ्या तीनशे कंपन्यांत देण्यात आल्या. तर, हजारोंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT