Shivajirao Aadhalrao Patil, Shrirang Barne  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Political News : नव्या राजकीय भूकंपामुळे बारणेंचा लोकसभेचा मार्ग झाला सोपा,तर आढळरावांचा बिकट...

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : महाराष्ट्रात वर्षभऱातच दुसरे मोठे राजकीय बंड काल (दि.२) झाले. गेल्यावर्षीचे शिवसेनेतील ते यशस्वी झाले. कालचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ते वर्षभर टिकले,तर त्याचे परिणाम लोकसभा,विधानसभाच नाही,तर महापालिका निवडणुकीतही दिसणार आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा यशाची आणि नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी फोडली आहे. त्याचें दूरगामी परिणाम होणार आहेत.त्याचा फायदा लोकसभेअगोदर महापालिका निवडणुकीतच भाजपला होणार आहे. जर ही निवडणूक दिवाळीच्या दरम्यान झाली,तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत अगदी सहजपणे आता त्यांना पुन्हा सत्तेचा सोपान चढता येणार आहे.

कारण तेथील मुख्य प्रतिस्पर्धी असलेला राष्ट्रवादीच आता त्यांचा पार्टनर झालेला आहे. त्यामुळे त्यांना तेथे तुल्यबळ विरोधकच नसेन. ठाकरे गटाचे हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच नगरसेवक गतवेळी होते. तर, कॉंग्रेसचा एकही नाही. त्यामुळे भाजपची पिंपरी पालिकेतील वाट कालच्या राजकीय उलथापालथीनंतर एकदम सुकर झाली आहे.

दहा महिन्यानंतर मे २०२४ मध्य़े लोकसभेची निवडणूक अपेक्षित आहे. त्यावेळी या बंडाचा भाजपला महाराष्ट्रात आपले जास्त खासदार निवडून आणून केंद्रातील सत्तेत वाटा उचलण्यात खरा फायदा होणार आहे. पिंपरी-चिंचवडचा विचार केला,तर येथे तो त्यांना होणार आहे. शहराचा समावेश असलेल्य़ा मावळ व शिरूरमध्ये श्रीरंग बारणे आणि डॉ.अमोल कोल्हे हे शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीचे खासदार आहेत.

...म्हणून खासदारकीच्या हॅट्रिक साधता येणार !

मावळची जागा शिवसेनेला सोडावी लागेल. तेथे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे(Shrirang Barne) हेच उमेदवार असतील. त्यांनी स्वत तशी घोषणा यापूर्वीच केली आहे. कालच्या राजकीय भूकंपामुळे मावळचे त्यांचा २०२४ चा मार्ग निर्वेध झाला आहे. त्यांना खासदारकीच्या हॅटट्रिक साधता येणार आहे. कारण गतवेळी २०१९ ला त्यांचा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचा उमेदवार होता. आता राष्ट्रवादीच महायुतीत आल्याने २०२४ ला त्यांचा उमेदवार नसेल. उलट त्यांची रसद बारणेंना मिळेल.

भाजपकडे लांडगेंसारखा तगडा उमेदवार...

मावळच्या उलट परिस्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघात या राजकीय उलथापालथीतून निर्माण झाली आहे.तेथे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे अजित पवार यांच्याबरोबर न आल्याने तेथे महायुती उमेदवार देण्याची शक्यता आहे. तो बंडखोर राष्ट्रवादीचा असेल किंवा भाजपचा सद्यस्थिती लक्षात घेता खासदार कोल्हेंविरुद्ध बंडखोर राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार दिसत नाही.

तर भाजपकडे,मात्र भोसरीचे आमदार महेश लांडगेंसारखा तगडा उमेदवार आहे. त्यांनी शिरूरमधून तयारीही सुरु केली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडून खेचून घेत पवारांना शह देण्याची आयती संधी नव्या राजकीय बंडातून भाजपला चालून आली आहे.

दुसरीकडे शिरूरचे तीनवेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी जोरदार तयारी पुन्हा सुरु केली आहे. गतवेळी पराभूत झाल्यापासूनच ते नव्या दमाने पुन्हा खासदार होण्याच्या तयारीला लागले होते. म्हणून ते म्हणजे शिवसेना(Shivsena) नव्या राजकीय परिस्थितीत शिरूरवर दावा ठोकू शकते.पण,भाजप तो सहज मान्य करेल,असे दिसत नाही. कारण अजित पवार यांची राष्ट्रवादी हा नवा दमदार भिडू त्यांना मिळाल्याने ते शिवसेनेचे लाड आता पूर्वीसारखे करतील असे वाटत नाही. त्यातून शिरूरची जागा न सोडता स्वतच त्यांनी लढायचे ठरवले,तर आढळऱावांची तयारी वाया जाण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT