Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe sarkarnama
पिंपरी चिंचवड

Loksabha Election 2024 : गेट वेल सून शिवाजीराव आढळराव-पाटील; कोणी मारला टोला...

Shirur Loksabha Political News: बैलगाडा शर्यत, बायपास, पिकाला भाव हे प्रश्न शिरूरच्या प्रचारात ठरणार कळीचे मुद्दे, त्यावरून सोशल मीडियात वॉर सुरू झाला आहे.

Uttam Kute

Shirur Loksabha News : बैलगाडा शर्यत, पुणे-नाशिक हायवेचे बायपास आणि शेतमालाला भाव हे प्रश्न शिरूर लोकसभेच्या प्रचारात कळीचे मुद्दे ठरणार आहेत. त्यामुळे त्यावरून तेथील आघाडी आणि युतीच्या उमेदवारात यापूर्वी उडालेला आरोप, प्रत्यारोपाचा धुरळा नव्याने सोशल मीडियात सुरू झाला आहे. या तिन्ही मुद्द्यांवर शिरूरचा प्रचार फिरणारच नाही, तर रंगणारही आहे. कारण ते तेथील मतदारांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. कारण गेली कित्येक वर्षे हे ज्वलंत प्रश्न प्रलंबित होते वा आहेत.

बैलगाडा शर्यतीचा मुद्दा शेतकरी आणि बैलगाडाशौकिनांचा भावनिक, तर शेतमालाच्या भावाचा, तर हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचाच मुद्दा आहे. बायपासचा प्रश्न, त्यांच्याच नाही, तर पुणे आणि नाशिक व त्या दरम्यानच्या रहिवाशांच्या दृष्टीनेही जिव्हाळ्याचा होता. कारण त्याअभावी या राष्ट्रीय महामार्गावर दररोजच त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. आता ते झाल्याने चाकण वगळता या हायवेवरील बहुतांश कोंडी ही कमी झाली आहे. त्यामुळे मतदानासाठी हे मुद्दे कॅश करण्याचा प्रयत्न युती आणि आघाडीकडून सुरू आहे.

तसेही यापूर्वी या प्रश्नांचा पाठपुरावा केला म्हणून शिरूरमधील आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि युतीचे (अजित पवार राष्ट्रवादी) शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात अनेकदा कलगीतुरा रंगलेला आहे. आता तो पुन्हा हे दोघेच उमेदवार असल्याने तो पुन्हा सुरू झाला आहे. सध्या त्याला ऑनलाइन तोंड फुटले आहे. ऑफलाइन प्रचारात तो लवकरच येण्याची शक्यता आहे.

खासदार असताना आपणच यासाठी कसा पाठपुरावा केला होता, त्यामुळे हे प्रश्न मार्गी लागले वा सुटले, असा दावा दोघेही त्यासंदर्भातले व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर टाकून करू लागले आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीची लोकप्रियता वादातीत असून, शेतकऱ्यांच्या दृष्टीने भावनिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. त्यामुळे बंद पडलेली ही शर्यत पुन्हा सुरू होताच तिचे श्रेय घेण्यावरून आढळऱाव आणि कोल्हेंत मोठी लढाई झाली. तशीच ती बायपासवरूनही रंगली.

त्यावरून कोल्हेंनी आव्हानाची भाषा सोशल मीडियात करताच आढळरावांनी लोकसभेत या प्रश्नावरून केलेले भाषण आणि त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओच पोस्ट केला. गेल्या पाच वर्षांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोल्हेंनी लोकसभेत एकदाही आवाज उठविलेला नाही, असा हल्लाबोल आढळरावांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर काल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावर लोकसभेतील या प्रश्नावरील आपले विचार मांडलेल्या भाषणातील मुद्दा कोल्हेंनी फेसबुकवरच टाकत लगेच उत्तर दिले. जे संपूर्ण देशाने पाहिले, ते तुम्हाला ऐकू आलं नाही, असा खोचक सवालही त्यांनी केला. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे, लवकर उपचार घ्या, बरे व्हा, गेट वेल सून शिवाजीराव आढळराव-पाटील, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. त्यावर आढळऱाव नक्कीच गप्प बसणार नाहीत. ते काय उत्तर देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT