Ajit Pawar Sarkarnama
पिंपरी चिंचवड

NCP Political News : ठरलं तर... लोकसभेला राष्ट्रवादीतच लढाई होणार!

Uttam Kute

- उत्तम कुटे

Pimpri Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दोन दिवसांचे शिबिर कर्जत (जि. रायगड) येथे सुरू आहे. त्यात अजित पवार यांनी शिरूरसह राज्यातील बारामती, सातारा आणि रायगड लोकसभा मतदारसंघांच्या जागा लढणारच, असे जाहीर केले. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीतच लढाई होणार असून, तिचे दोन गट एकमेकांना भिडणार आहेत. मात्र, राज्यात दावा केलेल्या ११ पैकी या चार जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामागे अनेक राजकीय कंगोरे दडलेले आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरील घोषणेतून त्यांनी शरद पवार गटाच्या राज्यातील सर्व खासदारांना आपल्या रडारवर घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागा आपल्या रडारवर घेण्यामागे शरद पवार गटाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच म्हणजे पुणे जिल्ह्यात सुरुंग लावण्याचा त्यांचा स्पष्ट इरादा आहे. त्यातूनच पवारांमार्फतच (अजित पवार) पवारांचा (शरद पवार) काटा भाजप काढत असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

पुणे Pune जिल्हा हा गड अभेद्य ठेवण्याचा हेतूही यामागे अजित पवार गटाचा आहे. फक्त लोकसभेच्या निकालानंतरच या चार मतदारसंघांत कुणाची जादू चालते, तेथील मतदार हा सीनिअर की ज्युनिअर पवारांच्या मागे उभा राहतो हे दिसणार आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजितदादांबरोबर असल्याने तेथे महायुतीच्या (अजित पवार राष्ट्रवादी) उमेदवारीचा प्रश्नच नाही, तर शिरूरमधून तीन वेळचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना त्यांनी आवताण दिलेलं आहे.

मात्र, त्यांनी ते अद्याप स्वीकारलेले नाही. त्यावर तूर्तास सावध भूमिका घेतली आहे. लोकसभेला वेळ असून दोन्हीकडून बोलणी सुरू आहेत असे सांगत बघूया, असे आढळराव यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले. शिरूरमधील महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय तिन्ही पक्ष बसून घेतील, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे पुन्हा लढण्याची त्यांची जोरदार सुरूच आहे. त्यामुळे फक्त पक्ष कुठला हाच प्रश्न आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत राष्ट्रवादीने शिरूरवर या जागेवर क्लेम केला असला, तरी त्यांच्याकडे आघाडीकडून फक्त उमेदवारीची घोषणाच बाकी असलेले विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हेंविरुद्ध तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे आढळराव यांना ते मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. त्यांच्या जनसंपर्काचा मोठा फायदा होऊ शकताे. त्यात मतदारसंघातील दोन पाटील आमदार (खेडचे दिलीप मोहिते-पाटील आणि आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील) त्यांच्याकडे आहेत.

इतर तीन आमदार (जुन्नरचे अतुल बेनके, शिरूरचे अशोक पवार आणि हडपसरचे चेतन तुपे) हे सध्या कुंपणावर असले तरी तेही येतील,अशी शक्यता अजित पवार गटाला वाटते आहे. त्यातून त्यांना निर्णायक ताकद मिळणार आहे. परिणामी प्रतिष्ठेच्या शिरूरला विजय मिळविण्याचा त्यांच्या इऱाद्यालाही बळ मिळणार आहे.

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे कट्टर समर्थक आहेत, तर बारामतीतही त्यांचेच खासदार (सुप्रिया सुळे) आहेत. त्यामुळे या दोन्ही जागा अजित पवारांनी लढविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तेथेही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी शिरूरसारखीच रंगतदार लढत होण्याची दाट शक्यता आहे, तर रायगडमधील आपल्या गटाचा राज्यातील एकमेव खासदार पुन्हा निवडून आणून प्रतिष्ठा राखण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे.

Edited by : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT