Prerna Katte Sarkarnama
पुणे

Kishor Aware Murder Case : एसीपी प्रेरणा कट्टे यांची बदली पुन्हा झाल्याने हाय प्रोफाईल आवारे खून तपासात पुन्हा आला अडथळा

उत्तम कुटे: सरकारनामा

Police Officer Transfer : शिंदे-फडणवीस सरकारचा बदल्यांतील घोळ आल्यापासून आतापर्यंत कायम राहिला आहे. २२ मे रोजी केलेल्या दीडशे एसीपींच्या (डीवायएसपी) बदल्यांत बदल करण्याची हॅटट्रिक या सरकारने केली. त्यातून पिंपरी-चिंचवडच्या एसीपी प्रेरणा कट्टे यांना आठ दिवसांतून तिसऱ्यांदा बदलीला सामोरे जावे लागले आहे.

चाकणच्या एसीपी कट्टे यांची २२ मे रोजी नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून बदली करण्यात आली होती. ती दोन दिवसांतच गृह विभागाने रद्द करीत पुन्हा त्यांना पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) कायम ठेवले. त्यामुळे तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील हाय प्रोफाईल किशोर आवारे या राजकीय खून तपासात आलेला अडथळा दूर झाला होता.

कारण या खूनाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या त्या प्रमुख होत्या. मात्र, मंगळवारी पुन्हा त्यांच्या बदलीत बदल करण्यात आला. परिणामी आवारे खून तपासात पुन्हा विघ्न सरकारनेच आणले आहे. पुणे जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेल्या या खूनाने मावळ तालुक्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आता कट्टेंना पीटीएस पोलिस (Police) प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पाठवण्यात आले आहे. त्यांच्याजोडीने शहरातून बदली झालेले दुसरे एसीपी प्रशांत अमृतकर यांच्याही बदलीत आठ दिवसांत दुसऱ्यांदा बदल गृह विभागाने मंगळवारी केला. त्यांचीही नक्षलग्रस्त विभागात (डीवायएसपी, गडचिरोली) झालेली बदली फिरविण्यात आली. ती रद्द करून त्यांना पुण्यातच सेफ झोनमध्ये (डीवाएसपी, सीआयडी) ठेवण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागातील बदली रद्दसाठी मोठे सायास करावे लागल्याचे समजते.

गेले दहा महिने लटकत असलेली टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकतीच दूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने २२ मे रोजी राज्यातील दीडशे एसीपींच्या बदल्या २२ मे रोजी केल्या होत्या. दोन दिवसांतच त्यातील तीन रद्द केल्या गेल्या, तर नऊमध्ये बदल करण्यात आला. या बदलाची मंगळवारी तर हॅटट्रिक गृह विभागाने केली. २२ मे रोजी बदल्या केलेल्या अनेक एसीपींच्या त्या रद्द करण्यात आल्या. काहींच्या बदलीच्या ठिकाणात बदल केला गेला. त्यातून ११ महिन्यांनंतरही राज्य सरकारचा बदल्यातील घोळ कायम राहिल्याचे स्पष्ट झाले.

तसेच त्या विचारपूर्वक केल्या गेल्या नसल्यालाही दुजोरा मिळाला. गेल्यावर्षी सत्ताबदल होताच नव्या सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला. मात्र, त्या विचारपूर्वक न केल्याने त्यातील घोळही लगेच समोर आला. कारण त्यातील अनेक बदल्यांत नंतर बदल करण्यात आला. काही रद्दच झाल्या. तर, अनेकांना बदलीनंतर कित्येक दिवस नियुक्तीच देण्यात आली नव्हती.

राज्याच्या गृहविभागाने २२ मे रोजी बदली केलेल्या १८ एसीपी तथा डीवायएसपींच्या बदल्या मंगळवारी पुन्हा फिरवल्या. तर तीन रद्द केल्या. आनंदा वाघ यांची श्रीरामपूरचे (जि.नगर) उपविभागीय अधिकारी (एसडीपीओ), संजय बांबळे यांची धाराशीवचे एसडीपीओ, तर साजन सोनवणे यांची अक्कलकुवा येथे याच पदावर झालेली बदली आता रद्द झाली आहे. त्यांना नियुक्तीचे नवे ठिकाण नंतर त्यांना दिले जाणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT