Shivajirao Adhalrao patil-Dilip Walse Patil
Shivajirao Adhalrao patil-Dilip Walse Patil Sarkarnama
पुणे

Shirur Loksabha Election : आढळरावांचं ठरलं; वळसे पाटलांच्या उमेदवारीचा निर्णय पाच जूननंतर...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : एकेकाळचे जिगरी दोस्त आणि त्यानंतर खासदारकीच्या निवडणुकीमुळे एकमेकांपासून दुरावलेले माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीपासून फारकत घेत आढळराव पाटील यांनी खासदारकीची हॅटट्रीक केली. पण, आगामी २०२४ च्या निवडणुकीत आढळराव आणि वळसे पाटील यांच्यात सामना होण्याची चिन्हे आहेत. त्याबाबतचे संकेत राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांसह खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या आपण इच्छूक नसल्याच्या विधानावरून मिळत आहेत. (Adhalrao patil adamant on contesting Lok Sabha: Walse Patil's decision will be taken after June 5)

दरम्यान, माजी खासदार आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी स्वतःची उमेदवारी जाहीरच केली आहे. मात्र, वळसे पाटील हे सध्या परेदशातू असून येत्या ५ जूननंतर ते महाष्ट्रात परतणार आहेत, त्यामुळे वळसे पाटील यांच्या उमेदवारीचा निर्णय ५ जूननंतरच होणार हे मात्र स्पष्ट आहे.

राष्ट्रवादीच्या गोटात असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेला निवडून जावे, अशी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा हेाती. पण, हा उमेदवारीचा विषयच वळसे पाटील आणि आढळराव यांच्या मैत्रीच्या नात्यात आढावा आला. त्या निवडणुकीनंतरच आढळराव पाटील आणि वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यात राजकीय वितुष्ट आले, ते आजअखेरपर्यंत कायम आहे. या दोघांनी एकमेकांना कायम शह-कटशह देण्याचे काम केले आहे.

लोकसभा निवडणूक लढविण्याचे आतापर्यंत टाळणारे दिलीप वळसे पाटील यांचे नाव आता शिरूर (Shirur) लोकसभेसाठी (Lok sabha) चर्चेला आले आहे. आतापर्यंत तगडा उमेदवार देण्याची जबाबदारी घेत वळसे पाटील यांनी स्वतःला लोकसभा उमेदवारीपासून दूर ठेवले आहे. त्यांनी २००४ मध्ये अशोक मोहोळ, २००९ मध्ये विलास लांडे, तर २०१४ मध्ये देवदत्त निकम आणि २०१९ मध्ये डॉ. अमोल कोल्हे यांना वळसे पाटील यांनीच आढळरावांच्या पुढे उभे केले.

आढळरावांना २००४ पासून पराभूत करायला निघालेल्या वळसेंना डॉ.अमोल कोल्हेंच्या माध्यमातून तगडा उमेदवार मिळाला आणि त्यांनी वळसे पाटील यांची इच्छा पूर्ण करत आढळरावांचा दणदणीत मतांनी पराभव केला. मात्र, आगामी निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय डॉ. कोल्हे यांनी घेतल्याने तगडा उमेदवार म्हणून वळसे पाटील यांचे नाव पुढे येत आहे.

आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील हे दोघेही सध्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. यात दिलीप वळसे पाटील हे परदेशात आहेत. आढळराव यांनी आपली उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. वळसे पाटील हे पाच जून रोजी भारतात परतणार आहेत, असे राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आढळरावांची उमेदवारी निश्चित असली तरी वळसे पाटील यांचा निर्णय ५ जूननंतरच होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT