Ajit Pawar | Shivneri | Maratha Reservation
Ajit Pawar | Shivneri | Maratha Reservation Sarkarnama
पुणे

"तुम्ही सुपारी घेवून आलाय का?"; शिवनेरीवरील भाषणावेळी अजित पवार भडकले

सरकारनामा ब्युरो

किल्ले शिवनेरी : आज शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर उच्चस्तरीय अधिकारी आमदार आणि खासदार उपस्थित होते. मात्र जन्मोत्सव सोहळ्यानंतरच्या भाषणादरम्यान अचानक अजित पवार काही उपस्थित तरुणांवर तुम्ही काय सुपारी घेवून आला आहे का? असा सवाल करत भडकलेले पाहायला मिळाले.

अजित पवार जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान भाषण करत असताना गड किल्ल्यांचा विकास, निधी या आणि अशा विविध मुद्द्यांवर भाष्य करत होते. ते मराठा, मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर बोलू लागले. त्या दरम्यान अचानक एका तरुणाने मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून किती दिवस रेंगाळत राहणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अजून किती दिवस न्याय मिळवण्यासाठी वाट पहावी लागणार आहे, असा सवाल या तरुणाने केला.

या दरम्यान अजित पवार यांनी त्या तरुणाला रागाच्या भरात सुनावायला सुरुवात केली. मी मघाशी तुमचं ऐकून घेतले. सारखं सारखं बोलायचं नाही. तुम्ही काय कोणाची सुपारी घेवून आला आहे का? आज शिवजयंती आहे, ही पद्धत नाही बोलायची. असे अजित पवार त्या तरुणाला म्हणाले.

अजित पवार भाषणादरम्यान पुढे म्हणाले, न्यायालयात अडचण आली. आयोग स्थापन करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील हायकोर्टात ते आरक्षण टिकलं, मात्र सुप्रीम कोर्टात ते फेटाळलं. सुप्रीम कोर्टाची भूमिका ५० टक्के वर आरक्षण नको अशी आहे. केंद्र सरकारनं कायदा करुन ५० टक्केवर आरक्षण द्यायला लागेल. आम्हीही मराठ्यांच्याच पोटचे आहोत. आम्हाला काही अभिमान नाही का? शिवबांनी काय शिकवलंय, सगळ्या जातींना पुढे घेऊन जायचंय. कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये असेही ते म्हणाले.

भाषणानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे कायद्यात बदलाची गरज आहे. याबाबत मघाशी काही तरुण सहकाऱ्यांनी मागणी केली. असं किती दिवस चालणार विचारलं गेलं. मात्र, आधीच्या आरक्षणाला धक्का न लागता कसं करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात पंतप्रधानांना भेटून त्यांना सांगण्याचं काम झालं आहे. त्यांनी चर्चा करुन सांगितलं की करून सांगतो, मात्र तरुण मुलांच रक्त सळसळ करतं मात्र बारकावे समजून घेतलं पाहिजे, असा सल्लाही अजित पवारांनी तरुणांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT