AJit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : अजितदादांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ajit Pawar highest civilian award proposal : अजित पवार यांना सर्वोच्च बहुमान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीमागील कारणे आणि राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाचा शिफारस प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीने पाठवण्यात यावा, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.

एका युगाचा अंत

२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात महाराष्ट्राने एक अष्टपैलू आणि 'अ‍ॅक्शन ओरिएंटेड' नेतृत्व गमावले. अजितदादांच्या निधनाने राज्याची आणि देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. चेतन तुपे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला एक नवी दिशा दिली.

एक कणखर प्रशासक आणि अहोरात्र कष्ट करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या याच महान राष्ट्रसेवेचा यथोचित गौरव म्हणून त्यांना 'पद्मविभूषण' (मरणोत्तर) पुरस्कार मिळावा, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची आणि पक्षाची तीव्र भावना आहे.

या निवेदनात 'दादां'च्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

चेतन तुपे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात अजितदादांच्या लोकसेवेतील अनेक ठळक पैलू मांडले आहेत. प्रशासनावरील पकड आणि विकास: प्रशासकीय शिस्त आणि वेगवान निर्णयांसाठी अजितदादा ओळखले जायचे. राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांचे योगदान अमूल्य होते.

सहकार आणि शेतीचे आधारस्तंभ:

शेतकरी, कष्टकरी आणि सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.

जनकल्याणाच्या योजना:

सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा नेहमीच भर असायचा. "अजितदादांचे अचानक जाणे हे महाराष्ट्रातील एका युगाचा अंत झाल्यासारखे आहे. अशा महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमांचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा मरणोत्तर सर्वोच्च सन्मान होणे हे संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद ठरेल," असे चेतन तुपे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

विधानमंडळ सदस्यांची उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विधानमंडळ सदस्य आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT