Supriya Sule - Ajit Pawar
Supriya Sule - Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Supriya Sule On Ajit Pawar : '' अजितदादा आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीमध्ये फूट नाही!''; सुप्रिया सुळेंचा मोठा दावा

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

Pune : भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेकदा करण्यात आला, त्याला आता थोड्या प्रमाणात यश आले आहे. त्यातील काही जण सरकारमध्ये सहभागी आहेत. अजित पवार हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली असल्याने त्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली असल्याची माहिती बारामती मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आमचा पक्ष एकच आहे. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत असा दावाही खासदार सुळे यांनी यावेळी केला.

पुणे महापालिकेत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विशाल तांबे आदी, काका चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील किती आमदार नेमके कुठे आहेत याचे स्पष्ट आकडे आमच्याकडे नाहीत. पण अजूनही अनेकजण आमच्याकडे येतात, कधी तिकडे जातात. फक्त नऊ जण तिकडे गेले आहेत, बाकी इतर सर्वजण दोन्हीकडे आहेत असेही त्या म्हणाल्या.

छगन भुजबळ यांनी पवारसाहेबांवर टीका केली नसून, त्यांच्या मनातील भावना बोलून दाखविली आहे. पवारसाहेब राष्ट्रवादीची स्थापना होण्यापूर्वी चारवेळा मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. विधानसभेला राष्ट्रवादीच्या जागा जास्त आल्या तरी १४४ चा जादुई आकडा नव्हता, तसेच तेव्हा विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय पवार साहेबांना योग्य वाटला तो निर्णय त्यांनी घेतली, असे सुळे यांनी सांगितले.

बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार(Ajit Pawar) यांच्या झालेल्या भेटीबद्दल सुळे यांनी चोरडिया आणि आमचे संबंध खूप जुने आहेत असे सांगत त्यांच्या घरी गुप्त बैठक का होईल? असा प्रतिप्रश्‍न केला.

फडणवीसांवर अन्याय

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) बिचारे आहेत, १०५ आमदार निवडून आणले आहेत. पण ते मुख्यमंत्री न होता दुसऱ्याला मुख्यमंत्री केले. त्यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर मी काही बोलणार नाही, असा टोला सुळे यांनी लगावला.

राज्य सरकारला धोरण लकवा

राज्यातील सरकारला धोरण लकवा झाला आहे, त्यामुळे कोण काय करतंय हे त्यांना कळत नाही. कांदा प्रश्‍नावर मी चार महिन्यांपूर्वी पत्र दिले होते, पण केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही. कांदा प्रश्‍न निर्माण झाल्याने राज्याचे कृषिमंत्री दिल्लीत असताना दुसरे मंत्री त्याबाबत घोषणा करतात.

चारा छावणी, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावी म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे, पण हे सरकार धोरण लकवा झालेले आहे. त्यांच्यात गोंधळ आहे, अशी टीका सुळे यांनी केली. दरम्यान, राज्यात एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, दुसरे कोण सांगणे सुळे यांनी टाळले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT