Ajit Pawar and PMC Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : 'तुम्हाला अडविणारे आता कोणी नाही, त्यामुळे..' ; अजित पवार थेटच बोलले!

Mayur Ratnaparkhe

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रविवारी विकास आराखड्यावरून पुणे महापालिका प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. "महापालिकेमध्ये ३४ गावे समाविष्ट होऊन अनेक वर्ष झाली, तरी अजूनही या गावांचा विकास आराखडा तयार झालेला नाही. आता तरी महापालिका आयुक्तांनी समाविष्ट गावांचा विकास आराखडा लवकर पूर्ण करण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत. आता महापौर, विरोधी पक्षनेते किंवा तुम्हाला अडविणारे कोणी ही नाही, त्यामुळे कारणे देऊ नका, लवकर निर्णय घ्या. समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य द्या, '' असं म्हणत अजित पवारांना विकास आराखड्याला गती देण्याचे आदेश दिले.

लोहगाव येथील वाघोली समान पाणीपुरवठा, वडगाव शिंदे येथील जलजीवन योजनेचे उद्‌घाटन व धानोरीतील पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुनील टिंगरे, अशोक पवार, चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, रामभाऊ मोझे यांच्यासह वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण होत असल्याने लोहगावला जाण्यासाठी नवीन पर्यायी रस्त्याची गरज आहे. हवाईदलाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असेही पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार म्हणाले, ""ससूनच्या धर्तीवर लोहगाव येथे होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाला चांगला निधी देतो, त्याचे काम लवकर पूर्ण करून घ्या. डांबरी रस्त्यांऐवजी कॉंक्रीटचे रस्ते चांगले असल्याचा अनुभव आपण मुंबई पुणे महामार्गावर घेतला आहे. त्यामुळे कॉंक्रीटचे रस्ते करण्यास प्राधान्य द्या. रिंगरोडच्या कामाला १८० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. डिसेंबरपर्यंत रिंगरोडचे काम पूर्ण करायचे आहे.''

देहू, आळंदी, चाकण, राजगुरुनगर येथे पूर्वी ग्रामपंचायती होत्या, तेव्हा गावांना बकालपणा येत असल्याने तिथे नगरपरिषद करण्यात आल्या. त्यानंतरही तेथे अनधिकृत बांधकामे वाढत असल्याने या निमशहरांचा असंतुलित विकास होत आहे. धनकवडीमध्येही पूर्वी याच पद्धतीने अनधिकृतपणे बांधकामे वाढली, धनकवडी महापालिकेत आल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आले. म्हणूनच देहू, आळंदी, चाकण व राजगुरुनगरसाठी आता स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार सुरु आहे. स्वतंत्र महापालिका झाल्यास नियमांचे पालन होईल, गैरप्रकारांवर नियंत्रण येईल, तसेच या गावांचा संतुलित विकास होण्यास मदत होईल. असेही पवार यांनी सांगितले.

...तरीही त्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला नाही-

तीस वर्षांपूर्वी राजकारणात आलो. तेव्हा, रामभाऊ मोझे स्कूटरवर फिरायचे, आता ते मार्गदर्शकांच्या भूमिकेत आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही तरुणांना मार्गदर्शन करा, तरुणांना आता संधी द्या, अशी भूमिका आम्ही वरिष्ठांसमोर मांडत होतो. पण साठ वर्षांचा झालो, तरीही त्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला नाही, ' अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT