Uttam Jankar  Sarkarnama
पुणे

Uttam Jankar : अजितदादांचे 12, तर शिंदेंचे 18 अन्‌ भाजपचे केवळ 77 आमदार निवडून आलेत; जानकरांनी मांडले ईव्हीएमचे गणित (Video)

Mahayuti Government : जनमत नसलेले हे महायुतीचे सरकार कोणत्याही परिस्थितीत चार महिन्यांत जमीनदोस्त झालेले दिसेल, अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली आहे, असे उत्तम जानकर यांनी सांगितले

Vijaykumar Dudhale

Baramati, 29 December : उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ १२, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फक्त १८ आमदार निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ७७ आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे महायुतीमधील तीन पक्षांची मिळून संख्या केवळ १०७ एवढी आहे, त्यांच्यासोबत दोन ते तीन अपक्ष आहेत, त्यामुळे महायुतीकडे केवळ ११० आमदार आहेत. त्यामुळे जनमत नसलेले हे महायुतीचे सरकार कोणत्याही परिस्थितीत चार महिन्यांत जमीनदोस्त झालेले दिसेल, अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना जानकर यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे गणित विस्ताराने मांडले आहे. निवडणूक आयोग घरगड्यासारखे, तर सर्वोच्च न्यायालय भेदरलेल्या अवस्थेत काम करीत आहे. मात्र, कोणीतरी लढा दिला पाहिजे म्हणून मी ही लढाई लढत आहे, असा दावाही जानकर यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत जवळपास दीडशे मतदारसंघात सरकारने गडबडी केलेल्या आहेत. महायुतीचे (Mahayuti) मतदारसंघ किती आलेले आहेत. पूर्ण सकल माहिती काढल्यानंतर अजितदादासुद्धा बारामतीतून वीस हजार मतांनी पराभूत झालेले आहेत. अजितदादांना एक लाख ८० हजार जी मतं पडली आहेत. जवळपास दोनास एक या सूत्रानुसार बारामतीत युगेंद्र पवार यांची मतं ही ८० हजार अधिक ६० हजार अशी एकूण १ लाख ४० हजार एवढी होतात. अजितदादांची मतं ६० हजार कमी होतात, त्यामुळे अजितदादा हे एक लाख वीस हजारावर येतात. त्यामुळे अजितदादांचा बारामतीत वीस हजार मतांनी पराभव झालेला आहे, असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला.

जानकर म्हणाले, मी प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने आणि सखोलपणे अभ्यास केलेला आहे. प्रत्येकाला काय गणित लावलं आहे, हे लक्षात येत आहे. जयकुमार गोरे यांना एकास पाच असे सूत्र लावले आहे. जयकुमार गोरे यांना एक लाख ४८ हजार मतं आहेत, तर प्रभाकर घार्गे यांना १ लाख तीन हजार मतं आहेत. घार्गे यांची तीस हजार मते चोरली आहेत. ती मतं वजा केली तर घार्गे हे एक लाख ३३ हजारांवर जातात आणि जयकुमार गोरे एक लाख २१ हजारावर येतात. त्यामुळे माण खटावमध्येही घार्गे हे १२ ते १३ हजार मतांनी पुढे आहेत.

मारकडवाडीच्या लोकांनी मला मतदान केल्याची प्रतिज्ञापत्रे दिलेली आहेत. येत्या चार दिवसांत आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. त्यांना ही सर्व प्रक्रिया सांगणार आहोत. मतदानात जी गडबड करण्यात आलेली आहे, ती मशिनच्या कंट्रोल बॉक्समध्ये गडबड करतात, पण आम्हाला ती समजून येत नाही. आमचं साधं म्हणणं व्हीव्हीपॅडमधून जी चिठ्ठी येते, ते आमच्या हातात यावी आणि ती आमच्या हाताने बॉक्समध्ये टाकता यावी, अशी मागणी जानकर यांनी केली.

जानकर म्हणाले, तांत्रिकदृष्ट्या सर्व अंगानी मी त्याचा अभ्यास करत आहे. दिल्लीत आम्ही शरद पवार, राहुल गांधी असे सगळे मिळून निवडणूक आयोगाला भेटणार आहेत. आमच्या हातात व्हीव्हीपॅटची चिठ्ठी आली पाहिजे. या सरकारने राजीनामा दिला पाहिजे आणि तुम्ही देत नसाल तर माळशिरसच्या आमदारकीचा मी राजीनामा द्यायला तयार आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घ्यावी. माळशिरसमध्ये भाजपला किती मते आहेत, हे आम्हाला पाहायचे आहे. तसे पत्र आम्ही निवडणूक आयोगाला देणार असून ते मी शरद पवार यांच्याकडे दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT