Amol Kolhe News
Amol Kolhe News Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News: अजितदादांना 'आव्हान' देणार नाही तर 'आवाहन' करणार

प्रफुल्ल भंडारी

Daund News : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध खासदार अमोल कोल्हे असा सामना रंगत आहे. अजित पवार कोल्हे यांना थेट आव्हान देत असून अजितदादांवर टीका करताना कोल्हे मात्र सॅाफ्ट भूमिका घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आदरणीय व मोठे नेते आहेत, त्यांना 'आव्हान' देणार नाही, मात्र 'आवाहन' नक्की करत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घ्यावी. लादलेली कांदा निर्यातबंदी तातडीने उठविण्यासाठी त्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी कळकळीची विनंती आहे, असे आवाहन शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात शेतकरी आक्रोश मोर्चा दाखल झाला. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी हे आवाहन केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) पक्षाचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार यांनी राज्य सरकारच्या अखत्यारित दूध उत्पादकांना सरसकट अनुदान देणे, बिबट प्रवण क्षेत्रात अखंड वीजपुरवठा करणे, या प्रश्नांवर शेतकरी हिताची ठोस भूमिका घ्यावी. राज्यातील सत्तासंघर्ष आणि पक्षाच्या फोडाफोडीनंतर सत्तेचा उन्माद दाखविण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबी यंत्रातून फुलं आणि गुलालाची उधळण करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर आलो आहोत. भाजप सरकारकडून परकीय गुंतवणूक वाढल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती पाहता फक्त काही उद्योगपतींचे लाखो - कोटी रूपयांची कर्जे माफ होत आहेत. सर्वसामान्य तरूण आणि शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. देशातील व राज्यातील शेतकरी विरोधी सरकार जनता नाकारणार आहे, असेही कोल्हे म्हणाले.

आता आमच्या विरोधात खोट्या केस वाढणार : सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स व पोलिस यंत्रणेच्या ९५ टक्के धाडी व कारवाया या विरोधी पक्षांच्या लोकांवर झालेल्या आहेत. जशी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येईल तशा आम्हा सगळ्यांच्या विरोधात खोट्या केसेस वाढत जातील. त्यासाठी आमच्या मनाची तयारी आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून गुन्हेगारी वाढल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. काळ्या मातीशी इमान राखून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत असल्याचेही सुळे म्हणाल्या.

(Edited By - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT