Dilip Walse Patil Sarkarnama
पुणे

Bhimashankar Sugar Factory : वळसे पाटलांचा भीमाशंकर देशात सातव्यांदा चमकला; ‘नॅशनल शुगर फेडरेशन’कडून सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार जाहीर

National Federation of Co-op Sugar Factories : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत देशपातळीवरील १३, तर राज्य पातळीवरील १५ असे तब्बल २८ पुरस्कार मिळाले आहेत.

सुदाम बिडकर

Pune, 22 March : उस गाळप हंगामात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीजच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्या पुरस्कारांची आज (ता. 22 मार्च) घोषणा झाली. त्यात माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातील ‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भीमाशंकरला सातव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असून तो माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. स्थापनेपासून तो वळसे पाटील यांच्या ताब्यात आहे. चांगल्या बाजारभावासाठीही भीमाशंकर कारखाना पुणे जिल्ह्यात ओळखला जातो. सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा सात वेळा पुरस्कार मिळविणारा भीमाशंकर हा देशातील एकमेव काखाना आहे, असा दावाही कारखान्याकडून करण्यात येत आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीजच्या 2023-24 च्या गाळप हंगामातील पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. त्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला (Bhimashankar Sugar Factory) ‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ हा देश पातळीवरील पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे होणार आहे.

वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भीमाशंकर सहकारी साखर काखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील म्हणाले, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, ऊस वाढीच्या योजना, कर्जाची परतफेड, खर्चात बचत, वेळेत दिलेले ऊसबिल, ऊस उत्पादकता, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, उत्पादन खर्चात बचत, ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, कर्ज उभारणी मर्यादा, उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी याबाबींचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो.

कारखान्याचे संस्थापक वळसे पाटील यांचे दूरदृष्टी नेतृत्व, त्यांचे वेळोवेळी होणारे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून त्याची होणारी अंमलबजावणी, त्याला ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांची मिळणारी साथ यामुळेच देशपातळीवरील या पुरस्काराला गवसणी घालणे शक्य झाले आहे, असेही अध्यक्ष बेंडे यांनी स्पष्ट केले.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत देशपातळीवरील १३, तर राज्य पातळीवरील १५ असे तब्बल २८ पुरस्कार मिळाले आहेत. सात वेळा देशातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार मिळविणारा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा एकमेव आहे, असा दावाही कारखान्याकडून करण्यात आलेला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT