Pimpri Assembly
Pimpri Assembly  Sarkarnama
पुणे

Pimpri Assembly Election : पिंपरीवर आरपीआयसह भाजप पदाधिकाऱ्यांचा डोळा !

Chaitanya Machale

Pimpri News : पिंपरी विधानसभेच्या जागेवर महायुतीत सहभागी असलेल्या आरपीआय तसेच भाजपच्या नेत्यांनी दावा केला आहे. यामुळे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान आमदारांच्या अडचणी वाढणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पिंपरी विधानसभेतून लीड दिल्याचा दावा भाजपकडून केला जात असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही जागा लढविण्याचा निर्धार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भाजपबरोबरच मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) पदाधिकाऱ्यांनी देखील या मतदारासंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पिंपरी विधानसभेच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातून भाजपचे अमित गोरखे तर आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे सध्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे असलेल्या या जागेवर भाजपसह आरपीआयने डोळा ठेवल्याने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची चिंता वाढली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या वाट्याला फारसे यश आलेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कशा पद्धतीने रणनिती आखायची याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना तसेच भाजप नेत्यांच्या बैठकीत केले जात आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येण्यापासून थांबवायचे असेल तर महायुतीने योग्य ते नियोजन करत एकमेकांना मदत करत निवडणूक लढविणे गरजेचे आहे. अन्यथा याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता अधिक आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे लीड मिळाले नाही. उलट भाजपने (BJP) केलेल्या कामामुळे पिंपरीमधून बारणे यांना मताधिक्य मिळाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

तर आरपीआयने देखील पिंपरीच्या जागेवर दावा करत लोकसभेची पुनरावृत्ती करायची नसेल, तर पिंपरीची जागा आम्हाला सोडावी सोडावी, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्रि रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना विधानसभेसाठी दहा जागांवर दावा केला आहे. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही तरी आम्ही जोमाने काम केलं त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीने आठ ते दहा जागा द्याव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT