Murlidhar Mohol-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

BJP VS Congress : येणार होते दादा... आले मात्र अण्णा...!

Chaitanya Machale

Pune News : पुण्यातील जनवाडी, आशानगर येथे उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचा हट्ट भाजपच्या अंगलट आला आहे. या टाकीच्या कामाचे श्रेय देत नसल्याचा आरोप करीत काँग्रेसने सकाळी अकरा वाजताच या ठिकाणी जाऊन आंदोलन करीत पाण्याच्या टाकीचे अनौपचारिक उद्‌घाटन केले. त्यामुळे ज्यांच्या हस्ते हे उद्‌घाटन होणार होते, ते उपमुख्यमंत्री अजित पवार तिकडे फिरकलेच नाहीत. परिणामी माजी महापौर तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना आयत्यावेळी बोलावून हा उद्‌घाटन सोहळा उरकावा लागला. (Water tank in Pune was inaugurated by Murlidhar Mohol)

गोखलेनगर, जनवाडी आणि बाजूला असलेल्या आशानगर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या भागात पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. सुमारे 20 लाख लिटर क्षमतेची ही टाकी आहे. टाकीचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २६ जानेवारी) दुपारी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केले जाणार होते. अजित पवार यांच्या दौऱ्यात या कार्यक्रमाची अधिकृत नोंदही करण्यात आली होती. (BJP VS Congress)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही पाण्याची टाकी बांधण्याचे काम या भागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्या पुढाकारातून सुरू झाले होते. या कामासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यापासून टाकी उभारण्यासाठी संबंधित सोसायटीकडून मोफत जागा घेऊन ती पालिकेच्या ताब्यात देण्यापर्यंतचे काम बहिरट यांनी केले आहे.

उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी बहिरट यांना आमंत्रित करून त्यांचा योग्य तो मान ठेवावा, अशी विनंती काँग्रेसकडून महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, आयुक्तांसह आमदार शिरोळे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत पालकमंत्री अजित पवार यांच्याच हस्ते हे उद्‌घाटन करण्याचा निर्णय घेत काँग्रेसच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा होणार होता. मात्र, ज्यांनी प्रकल्पाचे काम केले आहे, त्याचे श्रेय काँग्रेसला न देण्याची आडमुठी भूमिका भाजपने घेतल्याने काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी एकत्र आले.

टाकीचे उद्‌घाटन करण्याचा इशारा काँग्रेसने दिल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस तेथून पुढे जाऊ देत नसल्याने धंगेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा तेथे पोलिसांशी वादही झाला. पोलिस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. या कामाचे श्रेय घेणाऱ्या भाजपचा निषेध व्यक्त करीत काँग्रेसच्या वतीने तेथे नारळ फोडून अनौपचारिक उद्‌घाटन करण्यात आले.

या पाण्याच्या टाकीच्या उद्‌घाटनासाठी येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दुपारनंतर शहरातून अचानक निघून गेले. ते नक्की कोठे गेले याची काहीही माहिती अजित पवार यांच्या निकटवर्तीय यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे आयत्या वेळी महापालिका प्रशासन आणि भाजपच्या वतीने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उद्‌घाटनासाठी आमंत्रित करून त्यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी या ठिकाणी येण्याचे टाळले असावे, अशी चर्चा पुणे शहरात रंगली होती.

Edited By : Vijay Dudhale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT