Vikram Khutwad-Kuldeep Konde
Vikram Khutwad-Kuldeep Konde  Sarkarnama
पुणे

कुलदीप कोंडे, विक्रम खुटवडांनी बाजी पलटवली!

किरण भदे

नसरापूर (जि. पुणे) : शिवसेनेचे (shivsena) कुलदीप कोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विक्रम खुटवड यांनी हरकतींमध्ये बाजी पलवटली असून त्यांची भोर (bhor) तालुक्यातील गावे पुन्हा त्यांच्या मूळच्या जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे गट आणि गणाच्या रचनेमुळे झालेले वादंग आता शमणार आहे. वेळू-नसरापूर व भोंगवली-संगमनेर या दोन गटांतील चार गावांची झालेली अदलाबदल हरकतीनंतर रद्द करण्यात आली आहेत. भोंगवली-संगमनेर व वेळू-नसरापूर या जिल्हा परिषद गटाचे अस्तित्व पुन्हा २०१२ च्या रचनेप्रमाणे असणार आहे. (Changes in two Zilla Parishad groups in Bhor canceled after objections)

भोर तालुक्यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार चार जिल्हा परिषद गट होत असून पहिल्या तीन गटांमधून चार गटांची निर्मिती करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी 2 जुलै 2022 रोजी प्रसिध्द केलेल्या गट आणि गणांच्या रचेनेमध्ये भोर तालुक्यात वेळू-नसरापूर, भोंगवली-कामथडी, भोलावडे-शिंद, कारी-उत्रौली हे चार गट निर्माण झाले होते. तालुक्यात 2017 पर्यंत चार गट होते, त्यानुसारच रचना होईल अशी राजकीय पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, 2022 मध्ये नव्याने चार गटाची रचना करताना नसरापूर-वेळू गटातील नसरापूर पंचायत समिती गणामधील कामथडी, खडकी, उंबरे व करंदी ही चार गावे वगळून त्यामध्ये जुन्या भोंगवली-संगमनेर गटातील संगमनेर गणामधील तांभाड, हातवे बुद्रूक., हातवे खुर्द, व मोहरी ही चार गावे नसरापूर गणाला जोडली गेली होती. त्या बाबत तालुक्यात शिवसेनेचे कुलदीप कोंडे व राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड हे या नव्या रचनेमुळे अडचणीत आल्याची मोठी राजकीय चर्चा रंगली होती.

या बाबत हरकत घेण्याच्या मुदतीत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खुटवड, शिवसेनेचे आदित्य बोरगे यांनी या चार गावांच्या आदलाबदलीबद्दल आक्षेप घेत हरकत घेतली होती. त्या बाबत १६ जुलै रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर बाजू मांडत भौगोलिकदृष्ट्या या चार गावांची अदलाबदल योग्य नसल्याचे मत मांडले होते. आयुक्तांनी त्यांची बाजू ऐकून घेऊन चुकीच्या गट रचनेत बदल करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना दिली. त्यानुसार प्रसिध्द झालेल्या गटरचनेत नसरापूर गावाला लागून असलेली कामथडी, करंदी, उंबरे व खडकी ही गावे नसरापूर गणात, तर हातवे बुद्रूक, हातवे खुर्द, तांभाड व मोहरी ही गावे संगमनेर गणात घेण्यात आल्याने पुन्हा २०१२ प्रमाणे गटरचना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या फेरबदलाचे स्वागत करताना विक्रम खुटवड यांनी सांगितले की, अखेर सत्याचा विजय झाला आहे. राजकीय दबावापोटी झालेली रचना भौगोलिकदृष्ट्या योग्य नव्हती. हे प्रशासनाने मान्य करुन योग्य दुरुस्ती केली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. कुलदीप कोंडे म्हणाले की, राजकीय स्वार्थ समोर ठेऊन दबाव टाकत जाणिवपूर्वक काही गावे मुद्दाम नदीपलीकडच्या गणात जोडली गेली होती. ती रचना योग्य नव्हती. त्या गावाच्या नागरिकांनीदेखिल या बाबत हरकत घेतली होती. त्यांची दखल घेऊन प्रशासनाने योग्य बदल केला असल्याने त्या ग्रामस्थांना योग्य न्याय मिळाला आहे.

नव्या रचनेत नसरापूर-वेळू गटातील गावे : शिंदेवाडी, ससेवाडी, वेळु, कासुर्डी खे.बा., कुसगाव, रांझे, खोपी, शिवरे, दोन्ही वरवे, कांजळे, कांबरे खे.बा., करंदी खे.बा., नायगाव, देगाव, साळवडे, केळवडे, कुरंगवडी, पारवडी, सोनवडी, सांगवी बु., कोळवडी, जांभळी, विरवाडी, दिडघर, केतकावणे निम्मे, कामथडी, खडकी, उंबरे, सांगवी खु., माळेगाव, नसरापूर.

भोंगवली-संगमनेर गटातील गावे : निगडे, धांगवडी, किकवी, मोरवाडी, वागजवाडी, भोंगवली, पैजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार हिंगे, न्हावी-315, न्हावी-322, राजापूर, भांबवडे, पांडे, सावरदरे, सारोळे, केंजळ, तांभाड, हातवे खु., हातवे बु., मोहरी बु., हिरश्चंद्री, दिवळे, कापूरहोळ, मोहरी खु., तेलवडी, कासुर्डी गु.मा., आळंदे, भैरवनाथनगर, आळंदेवाडी, इंगवली, संगमनेर, हर्णस, नऱ्हे, ब्राम्हणघर, माजगाव, जोगवडी, गोरड म्हसवली आदी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT