Chitra Wagh
Chitra Wagh Sarkarnama
पुणे

BJP News : चित्रा वाघ म्हणतात, ‘भाजपला बदनाम करण्याचा विरोधकांचा अजेंडा....’

रमेश वत्रे

केडगाव (जि. पुणे) : देशात आणि राज्यात भाजप (BJP) व त्यांच्या सरकारांना बदनाम करण्याचा एकमेव अजेंडा विरोधी पक्षांनी (Opposition) हाती घेतला आहे. मात्र, त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दौंड तालुक्यातील चौफुला येथे केले. (Chitra Wagh says, 'Opposition's agenda to defame BJP...')

महिला मेळाव्यास आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुल, जयश्री दिवेकर, वर्षा भागवत, नीलम काटे, संगिता ताडगे, नीलिमा शितोळे, जयश्री ताकवणे, स्नेहल शेलार, शुभांगी पासलकर आदी उपस्थित होते. यावेळी चित्रा वाघ यांच्या हस्ते भाजप महिला आघाडीच्या पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.

चित्रा वाघ म्हणाल्या, सक्षम विरोधी पक्ष काय असतो, हे आपण गेल्या अडीच वर्षांत दाखवून दिले आहे. सत्तेत आल्यामुळे आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. सरकारच्या योजना गोरगरीबांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. छत्रपतींच्या राज्यात गेल्या अडीच वर्षांत महिला आणि मुलींना नागवले गेले. भाजप-शिवसेना सरकारने कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली आहे. सरकार भयमुक्त वातावरण तयार करत आहे.

महिलांना कुणीही कमी समजू नये. देशातील मातृशक्तीने मोदींचे हात बळकट केले आहेत. काँग्रेसकाळात रोज बॅाम्बस्फोट होत होते. आता बॅाम्बस्फोट ऐकायला मिळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला आहे, त्यामुळे त्यांना कायम वंदन केले पाहिजे. मोदी सरकारने गॅस, शौचालय, लसीकरण दिले. ट्रिपल तलाकला बंदी आणली. आगामी काळातील निवडणुकीत भाजपचाच विजय होईल यात शंका नाही, असा दावाही वाघ यांनी केला.

आमदार कुल म्हणाले, लोकसभेची निवडणुक लढविताना या भागातील पाण्याचे भवितव्य चांगले राहिल ही अट टाकून उमेदवारी स्वीकारली. वीज, शेती, रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. पुढील पाच वर्षात दौंडच्या विकासाची खंत राहणार नाही. मागील अडीच वर्षत आलेले सरकार हे अपघाताने आले होते.

कांचन कुल म्हणल्या, ‘आपण दुस-या पक्षात होतो, तेव्हा आपल्यावर अन्याय झाला. साडेपाच हजार बांधकाम मजुरांना आर्थिक लाभ मिळत आहे, त्यापैकी अडीच हजार महिला आहेत. महिलांबरोबर तृतीयपंथीयांचे लसीकरण शिबिर घेतले. अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा विषय विधानसभेत मांडला आहे. पुरूषांबरोबरच महिलांनी सुद्धा महिलांना खंबीरपणे साथ दिली पाहिजे. तेव्हाच महिलांचे प्रश्न सुटतील. प्रास्ताविक दीपाली शिंदे यांनी केले. दिनेश गडधे यांनी सूत्रसंचालक केले तर मंजुश्री टिळेकर यांनी आभार मानले.

पीडीत महिलेची मैत्रीण बना

चित्रा वाघ म्हणाल्या, महिलांचे प्रश्न काय तर जन्मापासून ते सरणापर्यंत जे जे प्रश्न आहेत ते सर्व महिलांचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पिडीत महिलेची मैत्रीण बना. मग ती कुठल्याही जाती धर्माची असो. महिला हिंदू आहे का, की मुस्लीम हे महत्वाचे नाही तर बाईचे बाईपण महत्वाचे आहे.. ते जपले गेले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT