Dattatray Vare Sarkarnama
पुणे

Sarkarnama Exclusive : कारस्थानाच्या आरोपानंतर वारे गुरुजी पहिल्यांदाच स्पष्ट बोलले आणि...

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : वाबळेवाडीची जिल्हा परिषद मराठी शाळा राज्यात माहिती नाही, असे सध्या तरी कुणी सापडणार नाही. ही शाळा गेल्या काळात दोन कारणांनी राज्यात गाजली. एक म्हणजे शाळेचा आंतरराष्ट्रीय दर्जा, येथील शिकवण्याची प्रयोगात्मक पद्धत. याचे सर्व श्रेय मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी आणि त्यांच्या टीमला जाते, तर दुसरे कारण म्हणजे वारे गुरुजींवर प्रशासनाकडून झालेले विविध आरोप. सध्या वारे यांना 'क्लीन चिट' दिली असली तरी वाबळेवाडीच्या शाळेविषयी अद्यापही कुतूहल कमी झालेले नाही. (Latest Political News)

वाबळेवाडीची उभारलेली शाळा, त्याबाबत आलेले अनुभव आणि प्रशासनाने केलेल्या आरोपांना कसे सामोरे जावे लागले, याबाबत वारे गुरुजींनी 'सरकारनामा' टीमशी बुधवारी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. प्रशासनाकडून तोंडी एक सांगितले जात होते, तर मिळालेल्या नोटीसमधील शब्द वेगळे असल्याची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले, 'शाळाबाह्य व्यक्तीकडून पैसे घेतल्याचे तोंडी आरोप केले होते. तसेच वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे जिल्हा परिषदेकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या प्रत्येक नोटीसमध्ये मात्र निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा असेच शब्द होते. तोंडी वक्तव्ये आणि लेखीमधील शब्दांच्या फरकाने शाळेसह माझीही बदनामी झाली.' (Maharashtra Political News)

काचेची शाळा, क्रमिक अभ्यासक्रमाशिवाय इतर १६ वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन आणि थेट स्विडनच्या गोटलँड व एम. जी. स्कूल या दोन शाळांशी सामंजस्य करार करून वाबळेवाडी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला होता. यामुळे या जिल्हा परिषदेच्या शाळेत हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी वेटिंगला होते, असे राज्यात प्रथमच घडले. परिणामी परिसरातील तीन-चार प्रतिष्ठित इंग्लिश मीडियम शाळांवर गंडांतर आले होते. यातूनच वारे गुरुजींविरोधात कारस्थान रचल्याची चर्चा होती. यावर विचारले असता त्यांनी "तसे असू शकते", असे सांगितले.

दरम्यान, वाबळेवाडीच्या धर्तीवर शाळा निर्मितीसाठी तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील शाळांना लाखो रुपयांचा निधी जाहीर केला होता. असे असतानाही या शाळेच्या वारे गुरुजींवर लोकसहभागातील खर्चाबाबत अनियमिततेचे आरोप झाले होते. त्यानुसार प्रशासनाच्या विविध पताळींवरील चौकशांना ते सामोरे गेले. दोन वर्षांच्या चौकशीच्या फेऱ्यांनंतर दत्तात्रय वारे यांची सर्व आरोपांतून दोषमुक्तता करण्यात आलेली आहे.

काय होते आरोप ?

वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत एका शाळाबाह्य व्यक्तीकडून फी घेतल्याचे तोंडी आरोप (१४ जुलै २०२१) झाले. त्याबाबत तीन महिला जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेत गदारोळ (२२ नोव्हेंबर २०२१) केला होता. त्यानुसार तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी निलंबन (२२ नोव्हेंबर २०२१) करून त्यांची विभागीय चौकशी लावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT