eknath shinde sarkarnama
पुणे

Eknath Shinde : थोबाड फोडणे अन् लायकी काढण्याची भाषा; महायुतीत मिठाचा खडा? CM शिंदेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया...

Mahayuti News : महायुतीत घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि शिंदे गटात धुसफूस वाढली आहे. महायुतीत वर्चस्वाची लढाई येत्या काळात आणखी भडकण्याची शक्यता आहे.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीतील अपयश पुसून काढत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. असं असताना महायुतीतील तीन नेत्यांनी एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप सुरूच ठेवले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत दादागिरीचा भडका उडाला असून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात जोरदार राडे सुरू झाले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेना ( शिंदे गट ) नेते, रामदास कदम यांच्यात थोबाड फोडण्याची भाषा करण्यात आली. दुसरीकडे शिवसेनेचे ( शिंदे गट ) आमदार, महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर, आमदार जगदीश मुळीक यांनी आमदार अमोल मिटकरी यांना खडसावलं आहे. त्यामुळे महायुतीत खडा पडला का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "महायुतीत कुठलाही मिठाचा खडा पडणार नाही," असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

रवींद्र चव्हाण अन् कदम यांच्यात वाद काय?

"रवींद्र चव्हाण महायुती तोडण्याचे काम करत आहेत. कोकणसाठी त्यांनी काहीच केले नाही. मुंबई-गोवा महामार्गावरून एकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जावे, त्यांना काय अवस्था आहे ते कळेल. रवींद्र चव्हाण यांना महायुती तोडायची आहे त्यांना आवर घाला, बाजूला करा, त्यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र पाठवले आहे," असं कदम ( Ramdas Kadam ) यांनी म्हटलं होतं.

रवींद्र चव्हाण यांनी कदमांवर पलटवार करताना तोंड सांभाळून बोला, नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे सुनावले. "कदमांच्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाम खात्यामार्फत कोट्यवधी रुपये दिले. मी रवी चव्हाण आहे, कोणी वाचवायला येणार नाही. त्यावर माझे तोंड फोडायला तुला 100 जन्म घ्यावे लागतील. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणाऱ्यांना बाजूला काढा अन्यथा आम्ही वेगळे लढू," असे प्रत्युत्तर चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी दिले.

शिंदेंच्या आमदारांचा तटकरेंवर हल्लाबोल

रायगडचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे हे विश्वासघातकी असल्याची टीका केली. खोपोली येथील कार्यक्रमात थोरवेंनी म्हटलं., "राष्ट्रवादी हा विश्वासघात करणारा पक्ष आहे. कर्जतमध्ये त्यांचे तेच सुरू आहे." त्यावर, तटकरे म्हणाले, "थोरवे हे माझ्यासाठी अदखलपात्र आहेत. त्यांना आमचे स्थानिक नेते उत्तर देतील."

आमदार मुळीक अन् आमदार मिटकरी वाद...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यात्रेदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा असे विधान अजित पवार गटाचे आ. अमोल मिटकरी यांनी केले होते. त्यावर, असा खुलासा मागण्याची मिटकरी यांची लायकी आहे काय? असा हल्लाबोल भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केला.

फडणवीस यांची नाराजी

"रामदास कदम यांनी जाहीरपणे आरोप करणे योग्य नाही. असे आरोप कोणत्या युतीधर्मात बसतात? प्रत्येकवेळी भाजप आणि नेत्यांना वेठीस धरणे यातून चांगली भावना तयार होत नाही. कदम यांचे काय म्हणणे आहे हे समजून घेऊन त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करेन. रामदास कदम असे वारंवार टोकाचे बोलतात. त्यामुळे आमची मने दुखावली जातात. त्यांना उत्तर म्हणून आम्हीही पन्नास गोष्टी बोलू शकतो. मोठ्या नेत्यांनी पथ्य पाळली पाहिजेत," असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT