Shirur Lok Sabha Election 2024 : Ajit Pawar : Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : आधी शिरूर अन् आता मंचर, अजितदादांचा कोल्हेंवर तिखटवार; 'तीन पक्ष फिरून आलेल्या बोलघेवड्याने...'

Sachin Waghmare

Manchar News : शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार तथा खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या काही दिवसापासून शाब्दिक चकमक रंगली आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची संधी सोडत नाहीत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमुळे दोघातील मतभेद आणखी तीव्र झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आधी शिरूर अन आता मंचरमध्ये खासदार अमोल कोल्हेवर तिखटवार केले.

शिरूर मतदारसंघातील मंचर येथील सभेप्रसंगी अजित पवारांनी कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल केला. राजबिंडा दिसतो, मिशीवर ताव मारतो, असे म्हणत बटण दाबता मात्र राजकारण हा कोल्हेंचा पिंड नाही. सेलिब्रिटींना तिकीट देणं ही आमची चूक होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार कोल्हेंचा समाचार घेताना म्हणाले, काही लोक बोलघेवडे आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष देऊ नका. विकासाची वज्रमूठ पाहा आणि ते लक्षात घ्या. काहींनी मंचरमध्ये सभा घेऊन स्वाभिमानाच्या बढाया मारल्या. पण जे लोक तीन पक्ष फिरून आले आहेत, त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत, असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.

आमची विचारधारा सोडलेली नाही

कुकडी प्रकल्पाचे श्रेय शरद पवारांना दिले जात असताना अजित पवारांनी शेतकरी मेळाव्यातून कुकडी प्रकल्प हा दिलीप वळसे पाटीलांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील यांनी १९६८ साली याची संकल्पना मांडल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले. आम्ही बेरजेचे राजकारण करत आहोत. पण यात आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही, असे अजित पवार म्हणाले.

पाणी कोणी पळवून नेत असेल तर बोलणारच

सध्या जुन्नर तालुक्याचे पाणी कर्जत-जामखेडला वळवल्यावरुन आमदार रोहित पवार आणि अतुल बेनके (Atul Benke) यांच्यात वाद सुरु आहे. बेनके यांनी याप्रकरणात रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली होती. याबाबत बोलताना अजित पवारांनी म्हटले की, बेनके बोलले त्यात काही खोटेपणा नाही. जर तुमचे पाणी कोणी पळवून नेत असेल. कोणता प्रतिनिधी ते कसे खपवून घेईल, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

SCROLL FOR NEXT