Rahul Kul
Rahul Kul Sarkarnama
पुणे

ठाकरे सरकार पडण्याची फक्त औपचारिकता बाकी : फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचे सूचक विधान

रमेश वत्रे

केडगाव (जि. पुणे) : ‘‘ शिवसेनेच्या (shivsena) नाराज आमदारांची संख्या ४२ वर गेल्याची चर्चा आहे. हे खरे असेल तर सरकार पडण्याची आता औपचारीकताच बाकी आहे. सरकारमधील नाराज आमदार संधीची वाट पाहत होते. ती संधी आता आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या (bjp) पाचही जागा निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारची ही लिटमस टेस्ट जनता अनुभवत आहे. आजचा दिवस हा भाजपच्या नेत्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांसाठी आनंदाचा आहे,'' अशी प्रतिक्रिया भाजपचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. (Formality of the fall of Thackeray government is now left : Rahul Kul)

राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना होण्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भूमिका जशी महत्वाची ठरली. तसेच, हे सरकार पडले तर त्यात संजय राऊत यांचा वाटा मोठा असेल, असा दावाही आमदार कुल यांनी केला आहे. राहुल कुल हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

राहुल कुल म्हणाले, शिवसेनेचे आमदार एका रात्रीत गायब झाल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. एकूणच मंत्री व आमदारांमध्ये इतका असंतोष असेल तर जनतेमध्ये किती असंतोष असेल, याचा यावरून अंदाज घेता येऊ शकतो. मंत्री व आमदारांची न होणारी कामे, गुन्हे दाखल झालेल्या मंत्र्यांमुळे सरकारची डागाळलेली प्रतिमा, सरकारमधील समन्वयाचा अभाव या सर्वांचे प्रतिबिंब या निवडणुकीत उमटले आहे. महाविकास आघाडीतील मंत्री आणि आमदारांमध्येच परस्परांबद्दल खूप नाराजी आहे.

या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व सरकारमधील नाराजी या दोन महत्वाच्या बाबींचा निकालावर परिणाम झाला आहे. पाचव्या जागेसाठी शून्यापासून सुरुवात करणाऱ्या भाजपने प्रचंड मोठी मजल मारली आहे. विजयासाठी २५.७६ मतांचा कोटा असताना ही मते २८ ते ३० पर्यंत गेली आहेत. मोठ्या फरकाचा विजय हा भाजपचा उत्साह वाढविणारा आहे. देवेंद्र फडणवीस यांची विद्वत्ता आणि भाजपच्या नियोजनामुळे हे शक्य झाले आहे, असेही कुल यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या मतमोजणीसाठी भाजपने ज्या आठ आमदारांवर ही जबाबदारी सोपवली होती, त्यात माझाही समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि मतमोजणीसाठी माझी निवड केली. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. तो मी तू कधीही विसरू शकत नाही. मतमोजणीसाठी आमदार राहुल कुल यांच्यासह आशिष कुलकर्णी, राम सातपुते, बंटी भांगडिया, अमित साटम, अतुल सावे, सिद्धार्थ शिरोळे, मेघना बोर्डीकर यांची निवड करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT