BJP Sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : ...तर लोकशाही, संविधानाची ओळख पुसली जाईल; कोणी केली भीती व्यक्त?

Uttam Kute

Pimpri News : पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ या दोन जागा आघाडीत अनुक्रमे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लढणार हे नक्की झाल्याने ते तेथे तयारीला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महिनाभरात रविवारी (ता. 25) दुसऱ्यांदा मावळचा दौरा करून तेथील पक्ष पदाधिकाऱ्यांना चार्ज केले.

जनतेचाच नाही, तर पत्रकारांचाही आवाज देशात दाबला जात असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेला निर्भय बनावे लागणार आहे, असे ठाकरे म्हणाले. ते झाले नाही तर देशातील लोकशाही आणि संविधानाची ओळख पुसली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. देशातील लोकशाहीला धोका असणाऱ्या आणि देशाचे संविधान बदलू पाहणाऱ्यांविरुद्ध ही निवडणूक असल्याने ती महत्त्वाची आणि जिंकणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

जर ती भाजप जिंकली तर पुढील पाच वर्षांनी निवडणूक होईल की नाही, याविषयी शंका आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ही निवडणूक का लढतोय हे लोकांपुढे न्या, त्यांना कळेल तेव्हा विजय आपलाच असेल, असा दावा त्यांनी केला. मात्र, त्यासाठी या ऑनलाइन आणि फास्टफूडच्या जमान्यात निवडणूक काळात शिवसेना शाखा आणि कार्यालयात न थांबता लोकांपर्यंत जा, असा मंत्र त्यांनी दिला.

आदित्य ठाकरेंनी 21 जानेवारीला मावळच्या पहिल्या दौऱ्यात तळेगाव दाभाडे आणि पिंपरीच्या सभेत मावळ निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात राज्यातील युती सरकारला घटनाबाह्य राज्य सरकार, मिंधे सरकार, खोके सरकार अशी शेलकी विशेषणे दिली होती. ती आज त्यांनी पक्षाच्या पिंपरी - चिंचवडमधील ताथवडे येथील मावळ पदाधिकारी मेळाव्यात पुन्हा दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे - पाटील, पिंपरीचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी - चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे उपस्थित होते. ठाकरेंच्या पुण्यातील कार्यक्रमामुळे उद्योगनगरीतील या मेळाव्याला दोन तास उशीर झाला.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडे देशाचे लक्ष असल्याचे बाहेरील राज्यात फिरलो तेव्हा समजल्याचे ठाकरे यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या जागाच नाही तर आघाडी लढवत असलेल्या सर्व 48 ही आपल्याच जागा आहेत समजून लढा, असे ते म्हणाले.

आघाडीचे जागावाटप होऊन आपल्याला किती जागा मिळतील हे न पाहता कामाला लागण्याचा आदेश त्यांनी दिला. गेल्या दोन वर्षांत राजकारण एकदम गलिच्छ होऊन त्याचा चोथा झाल्याची खंतही त्यांनी राज्यातील तीन राजकीय पक्ष आणि दोन कुटुंबे फोडल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT