<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis-Pradip Kand</p></div>

Devendra Fadnavis-Pradip Kand

 

sarkarnama

पुणे

अजितदादांना टक्कर देणाऱ्या कंदांना फडणवीसांचे भोजनाचे निमंत्रण!

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टक्कर देऊन प्रदीप कंद (pradip kand) यांनी भारतीय जनता पक्षाला बॅंकेत एन्ट्री मिळवून दिली. या यशाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोन करत कंद यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांना मुंबईत सागर बंगल्यावर भोजनाचेही निमंत्रण दिले. (Invitation to dinner by Devendra Fadnavis to Pradip Kand who won in Pune Bank)

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्हा बॅंकेतील प्रदीप कंद यांचा विजय राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी धक्का आहे. त्यातच कंद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अजूनही ‘स्नेहा’त असल्याने त्याचाच फायदा त्यांना बॅंकेच्या निवडणुकीत झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ५ जानेवारी) कंद यांनी मलबार हिलवरील सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीबाबत प्रदीप कंद म्हणाले की, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे माझ्या संपर्कात होते. मी निवडून येताच त्यांचा मला फोन आला होता. त्यावेळी त्यांनी माझे अभिनंदन करत आपल्या निवासस्थानी जेवणाचेही आमंत्रण दिले होते. त्यानुसार माझे मित्र दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासह मी बुधवारी मुंबईत जाऊन फडणवीसांची भेट घेतली. साधारण अर्ध्या तासांच्या या भेटीत आणि चर्चेत राज्य, पुणे जिल्हबाबतची त्यांची प्रचंड मोठी व्हीजन मला अनुभवला आली. एक मात्र नक्की की, मी आजपर्यंतच्या आयुष्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा नेता मी खूप जवळून अनुभवला आहे. त्याच अनुषंगाने फडणवीस हेसुध्दा राज्याचा कसा विचार करतात आणि त्याच वेळी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत मैत्री कशी जपतात. कुठलाच बडेजाव न दाखवता वैयक्तिक आयुष्यात कसे प्रेमाने वागतात, याचा मी अनुभव घेतला.

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या संपूर्ण निकालाची माहिती मी भेटण्याआधीच त्यांना होती. माझ्या विजयातील प्रत्येक मताचे गणित त्यांनी या भेटीदरम्यान सांगितले. तसेच, पुणे जिल्हा बॅंकेची सद्यस्थिती, बॅंकेतील राजकारण, नुकत्याच झालेल्या सर्व जागांसाठीच्या निवडणुका आणि त्यातील प्रत्येक सूक्ष्म घडामोडी त्यांना कशा ज्ञात होत्या, त्याचे मला आश्चर्य वाटले. मी त्यांच्या प्रतिभेच्या प्रेमात पडलो आहे. राजकारणात राहून मैत्री कशी जपावी, हेही त्यांनी दाखवून दिले आहे, असेही कंद म्हणाले.

‘पहाटेचा शपथविधी टिकायला हवा होता’

माझ्या राजकीय कारकिर्दीत अजितदादांचे किती योगदान आहे, हे मी नव्याने सांगायला नको. अजित पवारांबद्दल मी काही बोलावे, एवढा मोठा मी नाही, त्यामुळे दादांनी माझ्याबद्दल काहीही बोलावे, तो त्यांचा अधिकार आहेच. एक मात्र नक्की की, राजकारण, प्रशासन, राज्यकारभार आणि नेता म्हणून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याइतके मोठे नेते मी माझ्या आयुष्यात अनुभवलेले नाहीत. त्यामुळेच फडणवीस आणि पवार यांचा दोन वर्षांपूर्वीचा तो पहाटेचा शपथविधी वास्तवात तसाच ‘सरकार’ म्हणून राहिला असता तर आज राज्याचे चित्र वेगळे दिसले असते, असेही प्रदीप कंद यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT