Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar, supriya Sule Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election: अजितदादांच्या 9 सर्व्हेत ताईच आघाडीवर? दहावा सर्व्हे करून उमेदवार ठरवणार

Sudesh Mitkar

Baramati Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ बनला आहे. कारण या मतदारसंघामध्ये पवार कुटुंबीयांमध्ये प्रतिष्ठेची लढाई रंगणार आहे. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांनी नऊ सर्व्हे केले असून, या सर्व्हेत सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचा खुलासा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज पुरंदर दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, भाजपने केलेलं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नसून बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या अडीच लाख मताधिक्याने विजयी होतील.

नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात सहभागी झाले आहेत. गेल्या काही काळापासून त्यांचे कार्यकर्ते त्यांना साहेबांसोबत राहण्याची विनंती करत होते. अशा अनेक नेत्यांना त्यांचे कार्यकर्ते साहेबांसोबत राहण्याची विनंती करत आहेत. नीलेश लंके हे साहेबांसोबत आल्याने आता त्यांची ताकद वाढली असून, लंके हे पुढचे खासदार असतील, असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचंही रोहित पवार म्हणाले.

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघासह अनेक ठिकाणच्या जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. यावर रोहित पवार म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला, तर अजित पवार गटाकडून नऊ सर्व्हे करण्यात आले, या नऊ सर्व्हेमध्ये अजित पवार यांचे जे उमेदवार आहेत ते पिछाडीवर आहेत. प्रत्येक सर्व्हेमध्ये सुप्रिया सुळे याच आघाडीवर आहेत. त्यामुळे अजित पवार गट आता दहावा सर्व्हे करेल आणि उमेदवाराचा निर्णय घेईल असा खोचक टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला. रोहित पवार म्हणाले, "भाजपकडून (BJP) तपास यंत्रणाच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावून कुटुंबांना त्रास दिला जात आहे. हे सहन करण्याची ताकद सर्वच नेत्यांमध्ये नाही. त्यामुळे काही झुकतात आणि भाजपमध्ये प्रवेश करतात. बाकी लोक लढतात आणि इंडिया आघाडीमध्येच राहतात."

मराठा आंदोलन म्हणून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे एकत्र येताना दिसत आहेत. याचा फटका महाविकास आघाडीला बसणार का? याबाबत बोलताना पवार म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कोरेगाव-भीमाची दुर्दैवी घटना घडली. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता. याचा फायदा भाजपला झाला. त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार दिले होते त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच झाल्याचं पाहायला मिळालं. आतादेखील सरकारकडून मराठा विरोधात ओबीसी (Maratha-OBC) असं संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरंगे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होणार आहे, त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी याबाबत विचार करून महाविकास आघाडीसोबत यावं, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काही नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यावेळी त्यांना भाजप त्यांचा मानसन्मान ठेवेल असं वाटलं होतं. मात्र, भाजपने त्यांचा फक्त वापर करून घेतला. हे आता अनेक नेत्यांना समजून चुकलं आहे. त्यामुळे अनेक नेते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी इच्छित आहेत. मात्र, आम्ही शरद पवारसाहेबांना विनंती करणार आहोत की, "जे आपल्या विचारांचे आहेत त्यांना पुन्हा घ्यावं. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये ज्यांनी खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्यं केली आहेत, त्यांना पक्षांमध्ये घेऊ नये."

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT