India Alliance Sarkarnama
पुणे

India Alliance : …तरच इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत सत्तापालट करेल

Sudesh Mitkar

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्यायचे नाही, या एकमेव अजेंड्यावर विरोधकांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली एकजूट केली आहे. पण केवळ एकजूट करून भाजपचा पराभव करता येणार नसल्याचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दलित व अल्पसंख्याकांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचा आक्रोश अशा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित कार्यक्रम या आधारेच इंडिया आघाडी सत्तापालट करू शकेल, असे त्यांना वाटते.

समाजवादी विचारवंत व कार्यकर्ते यांच्या पुणे येथील साने गुरुजी स्मारक भवन येथे झालेल्या राज्यस्तरीय व्यापक परिषदेमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर विचारमंथन झाले. 'देशातील लोकशाही व संविधान यांचे संरक्षण करण्यासाठी समाजवादी विचारसरणीच्या आधारेच जनतेसमोर जावे लागेल. याबरोबरच वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दलित व अल्पसंख्याकांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचा आक्रोश अशा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित कार्यक्रम या आधारेच इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तापालट करु शकेल', असा सूर यामध्ये उमटला.

'इंडिया आघाडीतील (India Alliance) सर्व प्रमुख घटक पक्षांनी संतुलित भूमिका घ्यावी' असे आवाहनही करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षि (Kumar saptarshi), राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष  सुभाष वारे, विद्यमान अध्यक्ष सुभाष लोमटे, राम शरमाळे आदींनी मार्गदर्शन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशाला पुरोगामी विचार महाराष्ट्राने (Maharashtra) दिला असून समाजवादाची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रुजलेली असून समाजवादाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला, तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट मत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी या परिषदेमध्ये व्यक्त केले. आज देशात लोकशाही संपुष्टात आले असून अघोषित आणीबाणी केंद्र सरकारने लादलेली आहे. त्यामुळे भाजपा (BJP) सरकारला सतेतून बाहेर काढणे हा एकमेव उद्देश समोर ठेवून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व समाजवादी कार्यकर्त्यांनी झोकुन कामाला लागावे, असेही आवाहन डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला समाजवादी विचाराची गरज असून समाजवादी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये सक्रिय राहून लोकशाहीचा खून करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी जीवाचे रान करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. सुभाष वारे यांनी केले. देशाची घटना सुरक्षित ठेवणे हे देशातील सर्व सामाजिक संघटना, सामाजिक विचारवंत व समाजवादी पक्षाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट मत यावेळी बोलताना राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष सुभाष लोमटे यांनी व्यक्त केले.

 महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी समाजवादी पार्टी संपूर्ण शक्तीनिशी तयार असून येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला सतेतून बाहेर काढण्यासाठी सर्व कार्यकत्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन समाजवादी पार्टीचे कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी केले आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT