Ramdas Athawale Sarkarnama
पुणे

Ramdas Athawale News: 'शिर्डी आठवलेंना सोडा, अन्यथा मावळ अन् शिरुरमध्ये...'; 'आरपीआय'च्या नेत्याचा इशारा

Uttam Kute

Pimpri Chinchwad News : शिर्डी स्वत:ला, तर सोलापूर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी सोडण्याची मागणी 'आरपीआय`चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे केली आहे. ती मान्य झाली नाही,तर 'एनडीए'तून बाहेर पडणार नाही,असेही त्यांनी सोमवारी (ता.१८) स्पष्ट केले. दुसरीकडे दोन नाही,तर एकही जागा भाजप 'आरपीआय'ला देणार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा राज्यसभेचा दोन वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. हेच कारण देत भाजप त्यांना लोकसभेची जागा देणार नसल्याचे कळते.केंद्रात पुन्हा सत्तेत येऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या दृष्टीने एकेक जागा महत्वाची आहे.एकेक जागा जिंकण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु आहे.

त्यामुळे शिर्डीत २००९ ला पराभव झालेल्या आठवलेंसाठी ती जागा सोडून भाजप धोका पत्करणार नाही.कारण तेथून ते पुन्हा निवडून येतील याची खात्री त्यांना वाटत नाही.त्यामुळे ही जागा त्यांना ते देणार नाहीत,हे ही कारण आरपीआयला न देण्यामागे आहे.

जर,आठवलेंनाच शिर्डीचा जागा भाजप देणार नाही,तर तिथे सोलापूरची दुसरी जागा ते त्यांच्या पक्षाला सोडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे त्या जागेवरही त्यांनी फुल्ली मारली आहे. कारण तिथे त्यांनी आघाडीच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदेविरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उभे करण्याचे ठरवले आहे. परिणामी तेथून चर्चेत असलेले राज्यसभेचे माजी सदस्य अमर साबळे या पिंपरी-चिंचवडकराचे नावही मागे पडणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशाप्रकारे एकही जागा आरपीआयला मिळण्याची शक्यता नसल्याने पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे दोन माजी अध्यक्ष,मात्र आक्रमक झाले आहेत.त्यातील स्वप्नील कांबळे यांनी मागितलेल्या वरील दोन जागा सोडल्या नाही, तर मावळ आणि शिरुर या दोन लोकसभा मतदारसंघात काम करणार नाही, असा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला.तर आठवलेसाहेबांना शिर्डी सोडलाच पाहिजे, अन्यथा मावळ आणि शिरुरमध्य़े `नोटा`ला मतदान करू,असा इशारा दुसरे माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी सोमवारी (ता.१८)दिला.

भाजपच्या (BJP) कोट्यातून शिर्डी आरपीआयला देण्याची मागणी त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.तो सोडला, तर देशात भाजपच्या दृष्टीने चांगला संदेश जाईल,असे त्यांचे म्हणणे आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT