Pune News, 01 Sep : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील ५ हजार १२ रिक्त सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३१ ऑगस्ट रोजी शासन निर्णय जारी करून भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी महत्त्वाच्या अटी निश्चित केल्या आहेत.
या निर्णयानुसार संबंधित संस्था किंवा महाविद्यालयांनी शासनाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर जाहिरातीचा मसुदा विद्यापीठाकडे मंजुरीसाठी सादर करावा लागणार आहे. जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, यूजीसीच्या संबंधित अधिसूचनेनुसार अटी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाची माहिती स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर भरतीची जाहिरात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय ‘अ’ किंवा ‘ब’ वर्गातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत अधिकाधिक उमेदवारांना समान संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुलाखतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग
सहायक प्राध्यापक भरतीतील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे मुलाखतीचे सीसीटीव्ही प्रणालीद्वारे चित्रीकरण करणे. मुलाखतीच्या दिवसापासून किमान एक वर्ष हे रेकॉर्डिंग गोपनीय दस्तऐवज म्हणून सुरक्षित ठेवावे लागणार आहे. भरती प्रक्रियेत तक्रार, आक्षेप, चौकशी, न्यायालयीन अथवा वैधानिक कार्यवाही सुरू झाल्यास संबंधित रेकॉर्डिंग प्रकरण निकाली निघेपर्यंत जतन करणे बंधनकारक राहणार आहे.
ऑफलाइन अर्जाचीही सुविधा
ऑनलाइन अर्जाची पद्धत स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी ऑफलाइन अर्ज करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांचे अर्जही स्वीकारावे लागणार आहेत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करता न येणाऱ्या उमेदवारांनाही भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. दरम्यान, संबंधित विद्यापीठांनी मुलाखतीतील गुणांकनाचे निकष निश्चित करून त्यासाठी स्वतंत्र गुणांकनपत्र तयार करावे लागणार आहे. उमेदवाराची पात्रता अचूक असल्याची खातरजमा तसेच निवड प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याची खात्री करूनच अंतिम निवड यादीला मान्यता द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
निवड समितीवरही जबाबदारी
पारदर्शक पद्धतीने मुलाखत पार पाडण्याची जबाबदारी संबंधित निवड समितीवर निश्चित करण्यात आली आहे. संबंधित संस्था, विद्यापीठ, निवड समिती सदस्य आणि शासन प्रतिनिधींवरही पदभरतीची जबाबदारी राहणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ५ हजार १२ पदांची भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्ताधारित पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने प्रथमच सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्याचे म्हटले आहे. उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.