Nana Patole Sarkarnama
पुणे

Maratha Reservation : मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत..! पटोलेंनी केला 'हा' सवाल उपस्थित...

Amol Sutar

Lonavala News : मराठा आरक्षणप्रश्नी सरकार समाजाची व मनोज जरांगे यांची फसवणूक करत आहे. मराठा समाजाचा मागसलेपणा सिद्ध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अत्यंत घाईगडबडीत सादर करण्यात आलेला आहे.

या सर्व्हेत 500 प्रश्न आहेत. एका अर्जाला तास ते दीड तास लागतो, मग कोणत्या आधारावर हा सर्व्हे केला? मुंबई शहरात सहा दिवसांत 26 लाख लोकांचा सर्व्हे कसा काय होऊ शकतो? असे प्रश्न उपस्थित करत सरकार मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

लोणावळ्याच्या हॅाटेल मेट्रो पार्क येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून काँग्रेस पक्षाच्या दोनदिवसीय राज्यस्तरीय शिबिराचा शुभारंभ झाला, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या व घेतलेली शपथ पूर्ण केली, असे नवी मुंबईत जरांगे यांचे उपोषण सोडताना जाहीर केले होते.

पण पुन्हा उपोषण करण्याची वेळ जरांगे यांच्यावर का आली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जरांगे यांच्यात काय चर्चा झाली? हे जनतेला समजले पाहिजे. सरकार दोन जातीत भांडणे लावते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचे काम करत आहे. त्याचा निषेध करतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे व सर्वपक्षीय बैठकीतही ते मान्य करण्यात आले होते. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही काँग्रेसने आरक्षण प्रश्न उपस्थित करत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी विचारणा केली होती, पण सरकारने स्पष्टता आणली नाही.

2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात मराठा आरक्षणाचा ठराव एकमताने पास करून घेतला होता. परंतु ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही, कोर्टाने ताशेरे ओढले. आता पुन्हा अशी वेळ येऊ नये, यासाठी दोन दिवसांच्या अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, कायदा करत असताना स्पष्टता आली पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारने मागीसवर्गीय आयोगाचा अहवाल आत्ताच्या आता एका तासात वेबसाइटवर टाकून सार्वजनिक करावा आणि दोन तासांच्या आत अध्यादेश काढावा. अध्यादेश काढण्यास अधिवेशनाची गरज नाही, तो पास करण्यास अधिवेशन लागते.

आयोगाच्या अहवालात काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला व जरांगे यांनाही कळले पाहिजे, त्यासाठी दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज काय ? तसेच मनोज जरांगे यांची तब्येत महत्त्वाची आहे, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? मुख्यमंत्री शिंदे व मनोज जरांगे यांची बोलणी झाली, उपोषण सोडले, गुलाल उधळला व प्रश्न सुटला असे सांगितले. मग पुन्हा उपोषण करण्याची गरज का पडली याची उत्तरे दिली पाहिजेत, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, पृथ्वीराज साठे, प्रवक्ते राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT