Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Maratha Reservation: 'मविआ'ला मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढण्यात स्वारस्य नव्हतं; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

Sudesh Mitkar

Pune News : "मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका ऐकण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठा आरक्षणासाठी काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून प्रचंड आनंद होत आहे. महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढण्यात स्वारस्य नव्हते. त्यामुळे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झाले", अशी घणाघाती टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, महायुती सरकार मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका पूर्ण ताकदीनिशी लढवेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पाटील म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका ऐकण्याचा निर्णय प्रचंड आनंद देणारा आहे. या याचिकेमुळे मराठा समाजाचे विविध कारणाने झालेले मागासलेपण सिद्ध करुन, त्यांना आरक्षण मिळवून देण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकार आता वकिलांची मोठी फौज उभी करुन ही याचिका पूर्ण ताकदीनिशी लढवेल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देईल", असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाच्या आधारे आरक्षण मिळवून दिले होते. माननीय उच्च न्यायालयात मराठा समाज मागास असल्याची बाजू तत्कालीन राज्य सरकारने प्रभावीपणे मांडून माननीय न्यायालयाला पटवून दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर मोहोर उमटवली.

पण दुर्दैवाने राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर, या सरकारला मराठा आरक्षणासाठीची सुप्रीम कोर्टातील लढाई लढण्यात कोणतेही स्वारस्य नव्हते. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडत असताना जर राज्यात असाधारण स्थिती असेल, तर आरक्षण देता येतं, हे न्यायालयाला पटवून देता आलं नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण फेटाळले. यामुळे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झाले", असेही ते म्हणाले.

"एकनाथजी शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण कायदेतज्ज्ञांची फौज उभी करु‌, अन् सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास काही बाबी आणून देऊ. यात प्रामुख्याने जमिनीच्या विभागणीमुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे अवघड झाले. त्यामुळे मराठा समाज कालांतराने मागास होत गेला. त्यामुळे पुनर्विचार याचिकेमुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संधीचे महायुती सरकार सोनं करुन, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देऊ", असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT