Manoj Jarange Morcha Sarkarnama
पुणे

Maratha Reservation : ...म्हणून मुंबईच्या दिशने निघालेल्या जरांगेंनी बदलला मोर्चाचा मार्ग!

Chaitanya Machale

Pune News : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा मार्ग बदलण्यात आला आहे.

वाघोली, खराडी येथून सकाळी लवकर जरांगे यांचा मोर्चा मार्गस्थ होणार होता. मात्र पहाटेच्या सुमारास जरांगे तेथे आले त्यानंतर त्यांची सभा झाली. परिणामी सकाळी लवकर निघणार मोर्चा दुपारी निघाला. नगर रोड, विमाननगर, येरवडा या भागात मोठी गर्दी झाली होती. हा मोर्चा बंडगार्डन मार्गे संचेती चौकात येणार होता. मात्र मोर्चाला झालेला विलंब लक्षात घेत या मार्गाने हा मोर्चा गेल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही गोष्ट लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी जरांगे यांनी आपल्या मोर्चाचा मार्ग बदलावा, अशी विनंती केली. संगमवाडी मार्गे खडकी त्यानंतर जुना मुंबई पुणे रस्त्याने हा मोर्चा न्यावा, असे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र यासाठी मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी नकार दिला. यापूर्वी ठरलेले मार्गात बदल झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होईल, त्यामुळे कोणताही मार्ग बदलू नये, अशी भूमिका कार्यकत्यांनी घेतली होती. अखेर पूर्वी जाहीर केलेल्या मार्गात काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जहांगीर हॉस्पिटलकडून न जाता सादर बाबा चौकातून लोणावळ्याकडे मार्गस्थ होण्याची पुणे पोलिसांची जरांगेंना विनंती करण्यात आली होती. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद देत मराठा आरक्षण रॅली मार्गामध्ये अंशतः बदल करण्यात आलेला आहे.

त्यानुसार येरवडा पर्णकुटी येथून सादल बाबा चौकातून डावीकडे वळून - संगमवाडी- पाटील इस्टेट - संचेती ब्रिज- सिमला ऑफिस -वीर चाफेकर ब्रिज- पुणे विद्यापीठ -औंध मार्ग - राजीव गांधी ब्रिज मार्गे पुढे पिंपरी चिंचवड हद्दीत जाणार आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांनी शेवटच्या टप्प्यातील लढ्यासाठी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. जरांगे-पाटील यांची पदयात्रेचा काल पुण्यातील खराडी येथे मुक्कामी होता. त्यानंतर आज सकाळी त्यांचे पुढचे पाऊल मुंबईच्या दिशेने पडले आहे. यात बाब निदर्शनास आली ती म्हणजे अजित पवारांचे आमदार जरांगे-पाटील यांची भेट घेण्याची धडपड करीत आहेत.

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील यांची मागणी आहे. यासाठी जरांगे-पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई (Mumbai) अशी पदयात्रा सुरू केली आहे. आज सकाळी पुण्याच्या खराडी परिसरातून पदयात्रेला सुरुवात झाली. आज पदयात्रेचा मुक्काम लोणावळ्यात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT