Sushma Andhare and Manoj Jarange Sarkarnama
पुणे

Sushma Andhare : ''मागास म्हणता अन् जरांगे आडनावास जोडून पाटील लावायचा प्रयत्न करता'' ; सुषमा अंधारेंचं विधान!

Mayur Ratnaparkhe

Pune News : ''मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढत आहेत, असं आम्हाला सुरुवातीस निश्चित वाटत होतं. परंतु मागील आठ-पंधरा दिवसांमधील त्यांच्या ज्या भूमिका आहेत, कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा फोकस हललेला दिसतोय. आरक्षणावरचा फोकस हलवून व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणे, हे शोभत नाही.'' असं शिवसेना(ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ हे आमनेसामने आल्याचे दिसत आहे. दोन्ही नेत्यांकडून राज्यभरात जाहीर सभांचा धडका सुरू असून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगेंबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ''एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुन्हा पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे आम्ही आर्थिक मागासलेले आहोत असं म्हणता, दुसरीकडे तुम्ही 100-100 जेसीबीतून फुलांची उधळण करून देता. एकीकडे तुम्ही म्हणता की नाही आमच्याकडे काहीच नाही, दुसरीकडे 150 एकरातील मोसंबीच्या बाग तोडल्या जातात. एकीकडे तुम्ही म्हणता आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे, दुसरीकडे म्हणायचं त्याची काय लायकी माझ्या हाताखाली काम करायची, ही विधानं चुकीची आहेत.''

याशिवाय ''मराठ्यांना आरक्षण मिळावं का, तर नक्की मिळावं त्याला काहीच हरकत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लागावा का, तर अजिबातच लागू नये. त्यामुळे तेही गरजेचं आहे. या दोन्हीमधून मार्ग काढायची कुवत कुणाची आहे? तर ती केवळ केंद्र सरकारची आहे. कारण, आरक्षणाचा प्रश्न हा मुलभूत हक्कातील कलम 16शी संबंधित आहे आणि मुलभूत हक्कांवर जर घटना दुरुस्ती करायची असेल. तर अधिकार केवळ 368 (क) नुसार केंद्र सरकारचा आहे, म्हणजे भाजपाचा आहे.'' असंही अंधारेंनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर ''साधी गोष्ट आहे, भुजबळ असतील किंवा जरांगे या दोघांनाही मुख्यमंत्र्यांसमोर बसायचं आहे. विधानसभेत ठराव मंजूर करून घ्या आणि तो केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्राने विशेष अधिवेशन बोलवावं आणि हा प्रश्न निकाली काढावा. पण असं न करता केंद्रातील आणि राज्यातील सत्तेत असणारी भाजपा जाणीवपूर्वक कोंबडा-कोंबडीला दाणा टाकून ज्याप्रकारे झुंजवलं जातं, तसं झुंजी लावण्याचा प्रकार करत आहे.'' असा आरोपही यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपावर केला.

(Edited by - Mayur Ratnaparhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT