Uma Khapare Sarkarnama
पुणे

Uma Khapare : 'इंद्रायणी'च्या प्रदूषणावरून संतप्त उमा खापरेंचा सरकारला घरचा आहेर, म्हणाल्या...

उत्तम कुटे

Assembly Winter Session : महाराष्ट्राची ‘गंगा’ इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबद्दल विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दुसरी लक्षवेधी आठ दिवसांत विधान परिषदेत लागली. मात्र, त्यावरही नदी प्रदूषणमुक्त करू असे साचेबद्ध उत्तर मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याने ही लक्षवेधी लावलेल्या पिंपरी-चिंचवडकर आमदार उमा खापरे संतापल्या. त्यावर मात्र, सहा दिवसांत याप्रश्नी पुण्यात बैठक घेऊ,असे मंत्र्यांना सांगावे लागले.

13 तारखेला विधानसभेत भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या अश्विनी जगताप, खेड-आळंदीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) दिलीप मोहिते-पाटील यांच्या इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या लक्षवेधीवर ती प्रदूषणमुक्त करणार असल्याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडील नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आलेले उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर हा प्रश्न वरच्या सभागृहातही मंगळवारी उपस्थित झाला. खापरेंसह इतर सदस्यांनी त्यावर लक्षवेधी दिली होती. त्यावरही एसटीपीसारख्या उपाययोजना करणार असल्याचे साचेबद्ध उत्तर केसरकर यांनी देताच उमा खापरे संतप्त झाल्या.

गेली पाच वर्षे असंच अनेकदा सांगण्यात आले असून प्रत्यक्षात काहीच झालेले नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा वेळकाढूपणा असल्याचा घरचा आहेर त्यांनी दिला. त्यानंतर,मात्र सबंधित विभागांची याप्रश्नी पुण्यात 26 तारखेला बैठक घेऊ, असे केसरकरांना सांगावे लागले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राज्य सरकारने मंजूर करून केंद्राच्या मान्यतेसाठी तो मार्च महिन्यात पाठवला आहे. मात्र, दहा महिन्यांनंतरही त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दिपक केसरकर(Deepak Kesarkar) यांच्या उत्तरातूनही त्याला दुजोरा मिळाला. इंद्रायणी सर्वाधिक एमआयडीसीमुळे प्रदूषित होत आहे. त्यांचाही 995 कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडेच प्रलंबित आहे.

पिंपरी महापालिकाही आपले 48 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता तसेच नदीत सोडत असल्याने इंद्रायणी प्रदूषित होत आहे. त्याबद्दल एमपीसीबीने महापालिकेवर दोन खटले दाखल केले असून दंडाचाही कारवाई केली आहे. तर प्रक्रिया केलेल्या पाण्यातही दुषित घटक (बीओडी,सीओडी) प्रमाणापेक्षा अधिक आढळल्याने नुकतेच त्यांनी महापालिकेला नदी प्रदूषण रोखण्याच्या नव्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. म्हणजे पालिकेच्या एसटीपीत सांडपाण्यावर अपेक्षित व पूर्णपणे प्रक्रिया केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी नदीच्या कडेने बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. असा दावा पिंपरी महापालिका व राज्य सरकारने केला असला,तरी त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कारण रात्रीच नाही,तर दिवसाढवळ्याही इंद्रायणीसह पवना नदीतही राडारोडा टाकण्यात येत असल्याने या नद्यांना शहराच्या हद्दीत ओढ्याचे स्वरुप आले आहे. तर,शहरवासियांसाठी पवना धरणातून सोडलेले पाणी उचलले जाते ती पवना नदीही नुकतीच फेसाळल्याचे आढळले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT