Raj Thackeray Nitin Gadkari Sarkarnama
पुणे

Raj Thackeray On Gadkari : राज ठाकरेंच्या निशाण्यावर पहिल्यांदाच गडकरी; 'टोलनाक्या'च्या तोडफोडीवरून भाजप - मनसेत घमासान

सरकारनामा ब्यूरो

Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राजकारणापलीकडील मैत्री सर्वश्रुत आहेत. मात्र, समृध्दी महामार्गावरील सिन्नर 'टोलनाक्या'च्या तोडफोडीवरून भाजपकडून मनसेला कोंडीत पकडले गेल्यानंतर राज ठाकरे थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवरच घसरले आहेत. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री हे महाराष्ट्रातील आहेत आणि याच राज्यातील रस्ते खराब आहेत. यासारखं दुर्दैव नाही अशा शब्दांत राज ठाकरेंनी गडकरींवर घणाघाती टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील रस्ते आणि टोल या मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. ठाकरे म्हणाले, आम्ही भूमिका घेतल्यानंतर 65 टोलनाके बंद झाले. तरीदेखील तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. मात्र, ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू सांगितले होते. त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

...ते सगळे निर्ढावलेले आणि निर्लज्ज !

मला टोलबद्दल लोकांची भूमिका कळली पाहिजे. तेव्हा आम्ही भूमिका घेऊ शकू. मला टोलबद्दल लोकांची भूमिका कळली पाहिजे. तेव्हा आम्ही भूमिका घेऊ शकू. ते सगळे निर्ढावलेले आणि निर्लज्ज आहेत. याला जबाबदार आपला समाज आहे. त्यामुळे त्यांना कळले आहे, काहीही केलं तरी हे लोकं आम्हांलाच मतदान करणार आहेत. याचमुळे राजकारणीही लोकांना गृहीत धरत असल्याचेही ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात रस्ते बनवण्यात गडकरी अपयशी

बांद्रा वरळी सी-लिंक 10 वर्ष जातात आणि रामायणात सेतू पूल बांधण्यात आला पण रस्ते होईना, अशी टिप्पणी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी केली आहे. मागच्या 17 वर्षांपासून मुंबई- गोवा रस्त्याचं काम सुरू आहे. एक रस्ता पूर्ण व्हायला 17 वर्षे लागतात? एक ठिकाणी तुम्ही रस्ता बनवता दुसऱ्या ठिकाणी बनवत नाही. मग हा बनवलेला रस्ता खराब होतो. हे किती दिवस चालणार? महाराष्ट्रात रस्ते बनवण्यात नितीन गडकरी(Nitin Gadkari) अपयशी झालेत. असं राज ठाकरे म्हणालेत.

...तर टोल कशाचा घेता ?

मनसे नेते अमित ठाकरे(Amit Thackeray) यांचे गाडी अडवल्यामुळे समृध्दी महामार्गावरील सिन्नर टोलनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याचवेळी अमित ठाकरेंनी टोलनाक्याची तोडफोड केलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत अभिनंदन केलं. आता याच संदर्भात राज यांनी भाष्य केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, अमित टोलनाके फोडत चालला आहे, असे नाही. टोलनाक्यावर त्याची गाडी बराचवेळ होती. फास्टॅग असूनही गाडी अडविण्यात आली. टोल भरल्याचे सांगितल्यानंतरही त्याला अडवण्यात आले. त्यामुळे तोडफोड झाली. ही स्वाभाविक कृती होती अशाप्रकारे ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याच्या तोडफोडी कृतीचं समर्थनही केले.

भाजपाने टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले. राज्यातील रस्त्यांवर खड्डे आहेत तर टोल कशावर घेता आणि टोलचे पैसे कोणाला मिळतात, यावर भाजपा नेते बोलणार आहेत का असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT